मुंबई : मुंबईतून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, ड्रग्ज आणि बेकायदेशीर घुसखोरीविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग

मुंबई : मुंबईतून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, ड्रग्ज आणि बेकायदेशीर घुसखोरीविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मुंबईत रस्त्यावर उतरले आहेत. बीएमसीच्या के-ईस्ट वॉर्ड कार्यालयाजवळ झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबईच्या के-ईस्ट वॉर्ड कार्यालयाबाहेर शेकडो हिंदू कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात हनुमान चालीसाचे पठण करत आपला तीव्र निषेध नोंदवला. हातात केशरी ध्वज आणि मागण्यांचे प्लेकार्ड्स घेतलेले आंदोलक कमालीचे आक्रमक झाले होते.
आंदोलन अधिक तीव्र झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट पाहायला मिळाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
आंदोलकांचा मुख्य संताप मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर आहे. गेल्या सात वर्षांपासून या गंभीर मुद्द्यांवर वारंवार स्मरणपत्रे देऊनही बीएमसी प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. काही भ्रष्ट अधिकारी स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली काम करत असून हिंदूंच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
मुंबईत वाढती गुन्हेगारी आणि बेकायदेशीर घुसखोरी शहराच्या सुरक्षेसाठी मोठा धोका बनली असून प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत, अशी मागणी विहिंप आणि बजरंग दलाने केली आहे. आता या आंदोलनानंतर बीएमसी प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS