नांदेड जिल्ह्यातील विमाधारक शेतकर्यांच्या खात्यात पिकविम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असताना, माहूर तालुक्यातील काही शेतकर्यांना तांत

नांदेड जिल्ह्यातील विमाधारक शेतकर्यांच्या खात्यात पिकविम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असताना, माहूर तालुक्यातील काही शेतकर्यांना तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत आहे. मात्र या त्रुटी दूर करून लवकरच सर्व पात्र शेतकर्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी दिली.
या संदर्भात जिल्हा कृषी अधिकारी तसेच तहसीलदार, माहूर यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एकही पात्र लाभार्थी पिकविम्यापासून वंचित राहणार नाही, याची हमी देत शेतकर्यांनी संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले. मागील खरीप हंगामातील पात्र शेतकर्यांच्या खात्यात विमा परतावा जमा होण्यास सुरुवात झाली असली, तरी जिल्ह्यातील 17 महसूल मंडळांतील काही शेतकरी अद्याप लाभापासून वंचित आहेत. त्यामध्ये माहूर तालुक्यातील चार मंडळांचा समावेश आहे. तलाठी व विमा प्रतिनिधींच्या पथकाकडून मिश्र पिकांची आणेवारी चुकीची पाठविण्यात आल्याने हा विलंब झाला होता. मात्र आता त्या त्रुटी दुरुस्त करून अहवाल पुन्हा सादर करण्यात आल्यामुळे लवकरच संबंधित शेतकर्यांना लाभ मिळणार आहे. नांदेड जिल्ह्याची सरासरी आणेवारी 277 इतकी असून, मागील काही वर्षांत इतर तालुक्यांच्या तुलनेत माहूर तालुक्याची आणेवारी जास्त नोंदली जात आहे. यामुळे अनेकदा शेतकर्यांना अपेक्षित प्रमाणात विमा लाभ मिळत नाही. पिक कापणीच्या वेळी योग्य पद्धतीने नोंदी ठेवणे व जागरूकता बाळगणे आवश्यक असल्याचेही आ. केराम यांनी स्पष्ट केले. विमा परतावा देण्यासाठी चार निकष लागू असताना, सध्या विमा कंपनीकडून प्रामुख्याने पिक कापणीचा निकष वापरण्यात येत आहे. तसेच ‘एक रुपयात पिक विमा’ योजना बंद झाल्यामुळे काही शेतकर्यांनी विमा उतरवला नाही, त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. तरीही विलंब तात्पुरता असून, लवकरच सर्व पात्र शेतकर्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माहूर तालुक्यातील शेतकर्यांना पिकविम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या संपर्कात आहोत. एकही लाभार्थी वंचित राहणार नाही.

COMMENTS