मुबई : राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या, रुग्ण कल्या

मुबई : राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या, रुग्ण कल्याण समिती , जन आरोग्य समिती, महिला आरोग्य समिती, ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती या समित्यांची जबाबदारी महत्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगली व परिणामकारक आरोग्य सेवा देण्यासाठी यासर्व समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या संदर्भात आयोजित बैठकीत दिले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्यसेवा दिल्या जातात. या सर्व लोकहिताच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आरोग्य समित्यांची भूमिका महत्वाची असते. ग्रामीण भागासाठी ‘ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती व शहरी भागासाठी महिला आरोग्य समिती कार्यरत आहे. या समित्या स्वच्छता, पोषण, पाणीपुरवठा, तसेच प्राथमिक आरोग्य सेवा देण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. त्याचप्रमाणे जन आरोग्य समिती व रुग्ण कल्याण समिती या समित्या आरोग्य संस्थांमध्ये रुग्णकेंद्रित सेवा, सेवेची गुणवत्ता व निधीच्या पारदर्शक वापरासंबंधी लक्ष ठेवण्याची भूमिका बजावतात. ग्रामीण भागासाठी कार्यरत असलेल्या ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती मध्ये अशासकीय सदस्य म्हणून ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य (प्राधान्याने महिला), बचत गट, तरुण मंडळ, वन सुरक्षा समिती, महिला मंडळ, सामाजिक संस्था, गरोदर व स्तनदा माता, तीनवर्षा पर्यंतचे मुल असलेली माता व शासकिय रुग्णालयात आरोग्य सेवा घेणारे किंवा बरे झालेले दिर्घकालीन आजाराचे रुग्ण यांचा सदस्य म्हणून समावेश असणे अपेक्षित आहे.
शहरी भागासाठी कार्यरत असलेल्या महिला आरोग्य समिती मध्ये समाजकल्याण, सामाजिक बांधिलकी व नेतृत्व कौशल्य असलेल्या स्थानिक झोपडपट्टी भागातील जास्तीत जास्त वीस महिला सदस्यांचा समावेश अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत जन आरोग्य समिती कार्यरत आहे. या समितीमध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती अध्यक्ष/महिला सदस्य, महिला बचत गट अध्यक्ष, शालेय आरोग्यदूत, युवाकेंद्र युवा प्रतिनिधी, क्षयरोगमुक्त नागरिक, तसेच एक किंवा दोन मुलानंतर नसबंदी केलेला पुरुष यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश अपेक्षित आहे. शहरी भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी आरोग्यवर्धीनी केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या जन आरोग्य समितीमध्ये स्थानिक नगरसेवक, नागरी स्वराज्य संस्थेतील आरोग्य समिती अध्यक्ष, नेहरू युवा स्वयंसेवक प्रतिनिधी, एनजीओ प्रतिनिधी, महिला आरोग्य समितीचे अध्यक्ष, शालेय आरोग्य दूत, व दोन प्रतिष्ठित नागरिक यांचा समावेश असणार आहे.यासर्व समित्यांच्या पुनरुज्जीवन करण्याच्या प्रक्रियेत स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच समाजातील सेवाभावी नागरिक यांनी सहभागी व्हावे. आरोग्यसेवा अधिक परिणामकारक होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून, समित्यांच्या माध्यमातून स्थानिक गरजा ओळखून अंमलबजावणी तसेच त्रुटीबाबत त्वरीत उपाययोजना केल्यास नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देऊन, नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास दृढ होईल असे असे आरोग्य मंत्री म्हणाले.

COMMENTS