कल्याण : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील रायते पुलावर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी

कल्याण : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील रायते पुलावर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात आठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सिमेंट मिक्सर आणि प्रवासी वाहतूक करणार्या छोट्या चारचाकी गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा हृदयद्रावक प्रसंग घडला.
प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सुमारे अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कल्याणहून मुरबाडकडे प्रवासी घेऊन जाणारी गाडी रायते पुलाजवळ पोहोचली असताना समोरून येणार्या सिमेंट मिक्सरशी तिची जोरदार धडक झाली. धडकेचा वेग एवढा प्रचंड होता की गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि आतमध्ये बसलेल्या प्रवाशांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. मृतांमध्ये पाच पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की काही प्रवाशांचा मृत्यू जागीच झाला, तर काहींनी रुग्णालयात नेत असताना प्राण सोडल्याचे समजते. जखमी प्रवाशांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्यात आले होते. पाच आसनी गाडीत तब्बल बारा जणांना बसविण्यात आले होते, अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. त्यामुळे अपघाताची तीव्रता वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेग आणि प्रवाशांची संख्या या दोन्ही बाबींची चौकशी पोलीस करत आहेत. अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. काही जणांनी स्वतःच्या वाहनांतून जखमींना रुग्णालयात पोहोचवले. स्थानिकांच्या या तत्परतेमुळे बचावकार्याला गती मिळाली. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस आणि महामार्ग यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी परिसर सुरक्षित करत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS