मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी दहा वरिष्ठ सनदी अधिकार्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या निर्णयामुळे आगामी काळातील प्रशासकीय कामकाजाला नवे स्व

मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी दहा वरिष्ठ सनदी अधिकार्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या निर्णयामुळे आगामी काळातील प्रशासकीय कामकाजाला नवे स्वरूप मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईसारख्या महानगरातील पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन आणि नागरी सेवा सुधारणा यांसारख्या प्रश्नांवर अधिक परिणामकारक उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अश्विनी भिडे यांच्या जागी मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिवपदी लोकेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1993 च्या तुकडीतील हे अधिकारी यापूर्वी वीज वितरण क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. प्रशासनातील त्यांचा अनुभव लक्षात घेता मुख्यमंत्री कार्यालयाच्या कामकाजात समन्वय साधण्याची जबाबदारी ते पार पाडतील. याशिवाय इतरही काही महत्त्वाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विकासचंद्र रस्तोगी यांची कृषी विभागातून वित्तीय सुधारणा विभागात अप्पर मुख्य सचिव म्हणून बदली झाली आहे. विनिता वैद सिंघल यांना आपत्ती व्यवस्थापन विभागातून मृद व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी पाठवण्यात आले आहे. परिमल सिंग यांच्याकडे कृषी विभागाच्या सचिवपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. महानगरपालिका स्तरावरही बदल करण्यात आले असून, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लाहू माळी यांना मुंबईतील पुनर्वसन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी तर प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्यव्यवसाय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून बदली
कडक शिस्त आणि कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेल्या दिव्यांग विभागातून त्यांची आता ‘आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन’ तसेच वन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग विभागात त्यांनी आणलेला घोटाळा उघड आणि त्यांनी केलेली कठोर कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले होते. मात्र ती कारवाई पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली आहे.

COMMENTS