मागण्या मान्य केल्या नाहीत, तर अधिवेशन चालू देणार नाहीः मेटे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मागण्या मान्य केल्या नाहीत, तर अधिवेशन चालू देणार नाहीः मेटे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

सेट’ परीक्षेला 81 टक्के परीक्षार्थींची उपस्थिती (Video)
 कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी डॉ.मच्छिंद्र बर्डे
 लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता व्हेंटिलेटरवर 

बीड/प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. येत्या पाच जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. अन्यथा, सात जुलैला सुरू होणारे पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा मेटे यांनी सरकारला दिला. 

मराठा आरक्षणाची लढाई फक्त आजच्या मोर्चापुरती नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोवर हा लढा सुरुच राहणार, ही तर फक्त सुरुवात आहे, असे मेटे म्हणाले. बीडमध्ये आज मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा काढण्यात आला. त्या वेळी मेटे यांनी सरकार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. चव्हाण यांच्यासारखा नाकर्ता माणूस आजपर्यंत झालेला नाही. चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती; पण त्याकडे चव्हाण यांनी दुर्लक्ष केले. 2014 मध्ये जे आरक्षण दिले, ते ही चुकीचे होते. त्याची फळे आज आपण भोगतो आहोत, असा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण अतिशय चांगले होते; पण या माणसाच्या मूर्खपणामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे घालवले, असा आरोप मेटे यांनी या वेळी केला. इतकेच नाही तर मराठा समाजाला आरक्षण, मराठा समाजाला सवलती आणि चव्हाण यांचा राजीनामा घ्या, अशा तीन मागण्या मेटे यांनी केल्या. त्यासाठी पाच जुलैपर्यंतची वेळ देतो. नाहीतर सात जुलैला होणारे पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. काँग्रेसच्या मनात मराठा समाजाबद्दल जी गरळ आहे, ती काढायची झाल्यास  चव्हाण यांची हकालपट्टी करा. त्यांना हाकलेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा मेटे यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारने तीन दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल केली; पण महिना उलटून गेला तर राज्य सरकारने काहीही केले नाही, अशी टीका मेटे यांनी केली.

ठाकरे सरकारला लाथा घाला

मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटक आरक्षणाचा निर्णयही आपण मराठा मोर्चा जाहीर केल्यावर घेतला गेला. त्यासाठी मी न्यायालयात गेल्यानंतर सरकारने आपल्याला ईडबल्यूएस आरक्षण दिले. त्यामुळे या सरकारला लाथा घातल्याशिवाय त्यांना जाग येत नाही हे आता सिद्ध झाले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला लाथा घालण्यासाठी आता पुढे या असे आवाहन मेटे यांनी केले. मराठा समाजातील आमदारांना जर चाड असेल तर ते या आंदोलनाच्या मागे उभे राहतील, असे ते म्हणाले.

COMMENTS