मतांच्या ध्रुवीकरणासाठी राजकीय संदोपसुंदी

Homeताज्या बातम्यासंपादकीय

मतांच्या ध्रुवीकरणासाठी राजकीय संदोपसुंदी

लोकशाही सशक्त व्हावी, लोकशाही तत्त्वे जपली जावीत यासाठी कार्यरत राहण्याची गरज असते याचे भान राजकारणी नेते व कार्यकर्ते यांना फारच कमी आहे. याचा प्रत्

सेऊल दुर्घटनेचा बोध!
काॅंग्रेस सोबतचे शीतयुद्ध…! 
आत्मस्तुतीत रमलेला अर्थसंकल्प !

लोकशाही सशक्त व्हावी, लोकशाही तत्त्वे जपली जावीत यासाठी कार्यरत राहण्याची गरज असते याचे भान राजकारणी नेते व कार्यकर्ते यांना फारच कमी आहे. याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांतील महाराष्ट्रातील राजकारणांचा वेध घेतला असता लक्षात येतो. राजकीय पक्षाचे प्रमुख नेते, आणि मंत्रिपद उपभोगलेले नेते बेताल वक्तव्य करत, देशाच्या राज्याच्या एकात्मतेला जेव्हा आव्हान देतात, तेव्हा ते देशासाठी धोक्याचे ठरते. ही राजकीय संदोपसुंदी वाढत असून, याला अटकाव घालण्याची गरज आहे.
राज्यात सर्वात गाजत असलेले ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष हटत नाही, तोच महाराष्ट्रात हिंदू-मुस्लीम ऐक्याला तडा जाईल, अशाप्रकारे दोन समुदायामध्ये भांडण लावून, राजकीय दंगे भडकावण्याचा जो पर्यंत अमरावती, मालेगाव, नांदेडमध्ये झाला, तो केवळ मतांच्या धुव्रीकरणासाठीच. 1942च्या ‘चले जाव’ चळवळीनंतर देशात हिंदू-मुस्लिम प्रश्‍नावरून धार्मिक तणाव निर्माण झाला. त्यावेळी अशोक मेहता आणि अच्युतराव पटवर्धन यांनी हिंदू -मुस्लिम यांच्यात जातीय तणाव कसा वाढतो याचा बोध घेताना ‘कम्युनल ट्रँगल इन इंडिया’ (भारतातील जातीय त्रिकोण) हा ब्रिटिश सत्तेचा सिद्धांत मांडणारा ग्रंथ लिहिला. यात त्यांनी हिंदू – मुस्लिम प्रश्‍नाची पार्श्‍वभूमी ऐतिहासिक दाखले देऊन विशद केली आहे. स्वातंत्र्यांच्या 75 वर्षांनंतर देखील भारतासारख्या अखंडप्राय देशात हिंदू-मुस्लिम यांच्या प्रश्‍नावरून आजही राजकारण केले जाते, आणि आपली पोळी भाजून घेतली जाते. मात्र राजकीय धुव्रीकरणात सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो, त्याचे काय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय हिंसाचाराच्या घटना घडत आहे. आणि त्या घटनांवरून सुरु असलेले राजकारण देखील लाजीरवाणे आहे. राज्यातील हिंसाचारप्रकरणी विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर आरोप केला. तर सत्ताधार्‍यांनी विरोधकांना जबाबदार धरले. यातून जी राजकीय संदोपसुंदी सुरू आहे, त्यातून महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा उद्देश लपून राहिलेला नाही. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार आशिष शेलार यांचे रझा अकादमीसोबत असलेले फोटो व्हायरल करत, यावर काही प्रश्‍न उपस्थित केले. तर दुसरीकडे आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण देत हे फोटो जुने असून, आम्ही जर असेच फोटो काढले तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही. यानंतर आता तरी हे बेताल वक्तव्य थांबतील अशी अपेक्षा होती. मात्र तरी देखील, भाजपच्या नेत्यांकडून आणि सत्ताधार्‍यांकडून एकमेकांवर टीकचे बाण सुरूच होते. यातून सामजिक सलोखा निर्माण होईल अशा वक्तव्यांचा तर बिलकूलच समावेश नव्हता. उलट चिथावणीखोर वक्तव्य करत, सामाजिक धुव्रीकरणाला उत्तेजन देणारे वक्तव्य बाहेर येत होते. निवडणुका जवळ आल्या की, असे धुव्रीकरणाचे प्रकार समोर यायचे. मात्र राज्यातील एकंदर गेल्या महिन्यातील वातावरण बघितले असता, सर्वच पक्षांना निवडणुकीच्या प्रचाराने झपाटलेले दिसते. आगामी काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांत आपल्याच पक्षाला सत्ता मिळाली पाहिजे, यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली. नुसती कंबरच कसली नाही, तर ऐन-केन प्रकारे आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. त्यातूनच काही जिल्ह्यात हिंसाचार, जाळपोळीच्या घटना घडल्या. या घटना नुसत्या घडल्याच नाहीत, तर त्यानंतर राजकीय नेत्यांची वक्तव्ये यात तेल ओतणारी ठरली. यातून राजकीय पक्ष आपली संस्कृती आणि सभ्यता हरवून बसल्याचा प्रत्यय येतो. ज्या पक्षाचे नेतेपद मिरवित आहोत, त्या पक्षाचे तत्व नि सत्त्व यांच्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करायची नाही किंवा करणार नाही अशी जी दृढ निष्ठा असणे आवश्यकच नव्हे तर अत्यावश्यकच आहे, ती हळूहळू राजकारण्यांमधून लुप्त होत चालली आहे. अशा परिस्थितीत मतदारांनी आपली पक्षनिष्ठा कशी जपायची? ज्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन विजयश्री बहाल करतो, तो विजयी आमदार किंवा खासदार त्या पक्षाशी एकनिष्ठ राहील याची खात्री कोण देणार? राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय संदोपसुंदी सुरू असल्याचे दिसून येते. अमरावती, नांदेड आदी ठिकाणी झालेल्या हिंसाचारामागे केंद्र सरकारच्या विरोधात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर दुसरीकडे हिंसाचारामागे भाजप नेत्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला. अमरावती शहर बंदला हिंसक वळण लागल्यानंतर अमरावतीमध्ये दंगल उसळली. त्यामुळे सध्या अमरावती शहरात संचारबंदी असून पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. आज भाजपचे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी राज्यमंत्री प्रविण पोटे यांच्या 15 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काही दिवस तरी हा राजकीय धुव्रीकरणाचा प्रयोग महाराष्ट्राच्या पडद्यावर काही दिवस झळकतच राहणार असल्याचे यानिमित्ताने दिसून येते.

COMMENTS