Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपशी जुळवून घेण्याचे शिवसेना आमदाराचे पत्र ; प्रताप सरनाईक यांच्या पत्रावरून शिवसेना-भाजपत रंगला कलगीतुरा

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. युतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अजूनही उत्तम संबंध आहेत.

सख्या भावाचा व काकाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा | LOKNews24
‘पीएम किसान’, ‘नमो शेतकरी’साठी साडेतेरा लाख शेतकरी पात्र
आमदारांना फुकटची घरं का द्यायची ?

मुंबई / प्रतिनिधी: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. युतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अजूनही उत्तम संबंध आहेत. ते तुटण्याआधी भाजपशी पुन्हा जुळवून घ्या, अशी मागणी सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सरनाईक यांच्या भूमिकेवर सर्वच पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय जनता पक्षाने या निमित्ताने संधी साधत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला साद घातली असताना खा. संजय राऊत यांनी मात्र भाजपवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही.

’सरनाईक यांच्या मतावर आम्ही बोलणे बरोबर नाही,’ असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपले मत मांडले. सरनाईक हे शिवसेनेचे नेते, आमदार आहेत. त्यांनी आपल्या पक्षप्रमुखांना, उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली. उद्धवज यांनी त्यावर विचार केला, तर आमचे वरिष्ठ नेतेही त्याबाबत विचार करतील,’ असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले आहे. ’सरनाईक यांनी आता जी मागणी केली, तेच आम्ही 19 महिन्यांपूर्वी घसा फोडून सांगत होतो. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत शिवसेनेने जाऊ नये असेच आमचे म्हणणे होते. अल्पसंख्याकांचे लांगूलचालन हीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बेसिक थिअरी आहे. शिवसेनेचा त्याला विरोध होता. त्यावरच शिवसेना वाढली. सरनाईक यांनी हेच सांगितले. त्यांनी व्यक्त केलेले मत ही सच्चा शिवसैनिकाची भावना आहे; पण तेच आम्ही सांगितले, तर आमच्यावर टीका होते,’ असे पाटील म्हणाले. सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. ’तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्‍न आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून सुरू असलेला शिवसेनेचा विश्‍वासघात व केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिला जाणारा त्रास ही कारणे सरनाईक यांनी यासाठी दिलेली आहेत. खासदार राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ’एखाद्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असेल तर त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखे काय आहे? ते पत्र खरे असेल तर त्यात एक मुद्दा आहे. तो तुमच्या माध्यमातूनच मला कळला आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे, असे त्या पत्रात म्हटले आहे. हा गंभीर आरोप आहे. आता विनाकारण त्रास कोण कुणाला देतेय? तो विनाकारण त्रास काय आहे? याचा शोध घेणे गरजेचे आहे’, असे राऊत यांनी म्हटले आहे.

COMMENTS