बोठेविरुद्ध 300 पानी दोषारोपपत्र झाले तयार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोठेविरुद्ध 300 पानी दोषारोपपत्र झाले तयार

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार व दैनिक सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याच्यासह इतर सहा आरोपींच्या विरोधात जवळपास 300 पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

जनार्दन स्वामींवरील दीर्घकाव्याच्या मुखपृष्ठाचे अनावरण
नगरमध्ये विकले जाते नकली रेमन्ड कापड…गुन्हा दाखल
अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे संसार पाण्यात

अहमदनगर/प्रतिनिधी- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार व दैनिक सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याच्यासह इतर सहा आरोपींच्या विरोधात जवळपास 300 पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 20 ते 25 जणांच्या जबाबांचा समावेश असून सोमवारी वा मंगळवारी हे दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

जरे हत्याकांड प्रकरणामध्ये बोठे हा मुख्य आरोपी आहे. घटना घडल्यानंतर सुरुवातीला तो तीन महिने फरार झाला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाच पथके त्याच्या शोधासाठी पाठवली होती. त्याचा शोध घेत असताना तो हैदराबाद येथे असल्याचे लक्षात आल्यानंतर या पथकाने तेथे जाऊन त्याला मोठ्या शिताफीने अटक केली होती. त्याच्या समवेत तेथे चार साथीदार होते. त्या चार साथीदारांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमध्ये एक महिला आरोपी असून, तिचा अद्यापपर्यंत ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत 11 आरोपींचा समावेश करण्यात आलेला आहे. बोठेला अटक झाल्यानंतर त्याने पोलिस तपासामध्ये विविध माहिती पोलिसांना दिली आहे. ज्या वेळेला घटना घडली व तो फरार झाला होता, त्यावेळेस तो पहिले दहा दिवस नगर येथे असल्याचे चौकशीत उघड झाले. त्याने पहिले दहा दिवस नगरच्या रेल्वे स्थानकावर मुक्काम केल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच एका पोलिसाच्या मोबाईलवरून त्याने काहीजणांशी संपर्क साधल्याचेही सांगितले होते. त्यामुळे रेल्वे पोलिसांना पत्र लिहून याची माहिती तपासी अधिकार्‍यांनी मागवली होती. ती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही. तसेच यापैकी काहीजणांना जबाबासाठी सुद्धा बोलवण्यात आले होते. परंतु तेही आले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या संदर्भामध्ये तपासी अधिकारी अजित पाटील यांनी रेल्वे पोलिसांना पत्र देऊन त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना जबाबासाठी बोललेले आहे. अद्यापपर्यंत त्यांचे जबाब होऊ शकलेले नाहीत. मात्र, बोठे याला अटक करण्याच्या घटनेस 90 दिवस पूर्ण होत असल्याने त्यामुदतीआधीच त्याच्या संदर्भामध्ये आता पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

COMMENTS