किल्ल्यांचा इतिहास….रामशेज किल्ला…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किल्ल्यांचा इतिहास….रामशेज किल्ला…

नाशिकपासून अवघ्या १५ किमीवर रामशेज किल्ला आहे .दिसायला तसा हा गड छोटेखानी, अगदी एखाद्या टेकडी एव्हढाच. पण त्याला संरक्षण आहे ते चहुबाजुंनी असलेल्या क

भरदिवसा व्यावसायिकाने व्यक्तीच्या अंगावरून चालवली गाडी | LOK News 24
सांगली – पुरग्रस्तांना मदत न मिळाल्याने चक्काजाम आंदोलन
’माझी वसुंधरा’अंतर्गत चालता चालता कचरा उचलण्याची मोहीम

नाशिकपासून अवघ्या १५ किमीवर रामशेज किल्ला आहे .दिसायला तसा हा गड छोटेखानी, अगदी एखाद्या टेकडी एव्हढाच. पण त्याला संरक्षण आहे ते चहुबाजुंनी असलेल्या कातळकड्याचे. याच भक्कम नैसर्गिक तटबंदीच्या जोरावर आणि मूठभर मावळ्यांच्या मनगटाच्या ताकदीवर हा किल्ला मोगलांच्या  सैन्यबळापुढे तब्बल साडेपाच वर्षे झुंजला होता छत्रपती संभाजी महाराजांनी त्‍यांच्‍या कारकिर्दीत हा किल्‍ला सतत साडेपाच वर्षे मोगलांशी झुंजत ठेवला. त्याचप्रमाणे, प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे आणि तेथे त्यांची शेज आहे अशी लोकभावना. आहे म्हणून किल्ल्याला रामशेज हे नाव पडले.स्वराज्यातील बहुतांश किल्ले सह्याद्रीच्या द-याखो-यात व घनदाट झाडींमध्ये होते. रामशेज किल्ला मात्र यास अपवाद ठरतो. संपूर्ण नाशिकमधून या किल्‍ल्‍याचे दर्शन होते.

गडाचा इतिहास :-

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या निधनानंतर मराठ्यांचा सहज पाडाव करता येईल या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन खान फिरोजजंग या सरदाराला महाराष्‍ट्राच्‍या स्‍वारीवर पाठवले. त्‍याने रामशेज किल्ल्यावर चाँदसितारा फडकावावा आणि त्यानंतर त्र्यंबक, अहिवंत, मार्कडा, साल्हेर असे किल्ले जिंकून घ्यावेत असा औरंगजेबचा मनसुबा होता. औरंगजेबाच्या या कारवाईची कुणकुण लागताच

छत्रपती संभाजीराजांनी रामशेजच्‍या संरक्षणासाठी साल्हेर किल्‍ल्‍याचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला. ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या किल्लेदाराचे नाव स्पष्ट सापडत नाही,  औरंगजेबाच्‍या आज्ञेनुसार शहाबुद्दीन रामशेज किल्ल्यावर चालून आला. त्याच्यासोबत दहा हजारांची फौज होती आणि अफाट दारूगोळा आणि तोफा होत्या. त्‍यावेळी रामशेज किल्ल्यावर फक्त सहाशे मावळे होते. ते मुळचे मावळातील, धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी. 

शहाबुद्दीनन खानाने चार-पाच तासांत किल्‍ला ताबयात घेऊ या विचाराने किल्‍ल्‍यावर नाना त-हेने हल्‍ला केला. किल्‍ल्‍याभोवतीचा वेढा कडक केला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या. मात्र किल्‍ला त्‍याच्‍या ताब्‍यात येईना. रामशेज किल्ल्यावर तोफा नव्हत्या. पण संभाजीराजांनी प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारूगोळा उपलब्ध करून ठेवला होता. मग किल्लेदाराने आणि मावळ्यांनी तोफा बनवल्या. मराठ्यांनी किल्ल्यावरून खाली तोफांचा मारा सुरू केला. त्यामुळे शहाबुद्दीन खान गांगरून गेला. पाच महिने झाले, त्याला किल्ला काही जिंकता येईना. मोगलांचे तोफगाळे किल्ल्यावर पोचत नव्हते. तेव्हा मोगलांनी जंगलातील झाडे तोडून किल्ल्याच्या उंचीचा बुरूज बनवला आणि त्यावर तोफा नेऊन किल्ल्यावर डागण्याचा बेत आखला. त्यावरून ते किल्ल्यावर मारा करू लागले. मात्र त्‍याचा परिणाम झाला नाही. घनघोर युद्ध चालू होते. दोन वर्षे झाली, मात्र रामशेज किल्ला अजिंक्य राहिला.

त्‍यानंतर औरंगजेबाने शहाबुद्दीनला माघारी बोलावून ती मोहीम फत्तेहखानकडे सोपवली.

फत्तेखानने रामशेजवर आक्रमण चढवले. तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल किल्ल्यावर आले, की किल्ल्यावरून मराठ्यांच्या गोफणीतून दगड सुटायचे. दगड इतके जोरात सुटायचे, की काही मोगल जाग्यावरच ठार व्हायचे. फत्तेहखानला मावळे तसूभरही पुढे सरकू देईनात. इतका खटाटोप करूनही किल्ला हाती येईना. फत्तेहखानाचा एखादा तोफगोळा किल्ल्यावर पोचायचा आणि त्यामुळे किल्ल्याची तटबंदी किंवा बुरूज ढासळायचा. ते पाहून तो खुश व्हायचा. पण सकाळ झाली की तो बुरूज परत बांधून झालेला असायचा! ते पाहून फत्तेहखान आश्चर्यचकित व्हायचा. अनेक महिने सरले, हजारो मोगल मारले गेले, दारूगोळा वाया गेला.

फत्तेहखानने किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावर तोफांचा मारा चालू केला. मुख्य दरवाज्याशी मावळे गुंतवून ठेवले. मग फत्तेहखानने निवडक सैनिक घेऊन किल्ल्याच्या मागून चढाई सुरू केली. वाट अवघड होती तरीही त्यांचे सैनिक वर चढत होते. मावळेही तशा परिस्थितीत गाफिल राहणारे नव्हते. किल्लेदाराने  साथीला दोनशे मावळे घेतले आणि चहुबाजूंनी पहारा चालू केला. त्यांना फत्तेहखानाचा अंधारात चाललेला डाव समजला, मावळे बुरूजावर दबा धरून बसले. जसे मोगल सैनिक वर पोचले तसे मराठ्यांनी गोफणी फिरवल्या. किल्ल्यावरच्या मोठमोठ्या शिळा ढकलून दिल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोगल जीव मुठीत धरून उड्या मारू लागले. शत्रू पळून जाताना बघून मावळे आनंदित झाले

औरंगजेबाने फत्तेहखानला परत बोलावले आणि कासमखानला स्वारीवर पाठवले.

कासमखानने कडेकोट पहारा ठेवला. किल्ल्यावर दारूगोळा आणि अन्नधान्य पोचण्यासाठी वाट ठेवली नाही. किल्ल्यापासून काही कोसावर रूपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेऊन तयार होते, पण त्यांना रसद पोचवता येत नव्हती. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले, अन्नावाचून हाल होऊ लागले. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला आला, जोराचा पाऊस पडला, तो सलग दोन दिवस पडत होता. किल्ल्याच्या बाजूला मेलेल्या जनावरांची दुर्गंधी सुटली. मोगल सैनिकांना पहारा देणे अशक्य झाले. मग कासमखानने पहारा सैल केला. तो दिवस सरला, रात्र झाली. रात्रही सरली, नंतर पहारे पुर्ववत करण्यात आले. कासमखानच्या लक्षात आले, की मावळे ताजेतवाने दिसत आहेत. कासमखानला त्याची चूक लक्षात आली. त्या दोन दिवसांच्या सैल पहा-यात मावळे गडावर पोचले होते! रूपजी आणि मानाजी यांनी अन्नधान्य, दारूगोळा गडावर पोचवला होता. कासमखानला कळून चुकले, की रामशेज काबीज करणे हे स्वप्नच राहणार आहे. कासमखानही किल्ला जिंकू शकला नाही. किल्ला साडे पाच वर्षें झुंजत होता!

गडाचा परिचय :-

रामशेज किल्‍ला नाशिक-पेठ रस्त्यालगत उभा आहे. पेठ रस्‍त्‍यापासून अर्ध्‍या तासाच्‍या अंतरावर आशेवाडी नावाचे गाव आहे. ते किल्‍ल्‍याच्‍या पायथ्‍याशी असलेले गाव. नाशिकच्या सीबीएस बस स्थानकावरून ‘पेठ’ कडे जाणारी एस.टी. आशेवाडी गावाच्‍या फाट्यावर थांबते. तिथे उतरून आशेवाडी गावात पोचले, की रामशेज किल्‍ल्यावर चढाई करता येते.

रामशेजचा किल्‍ला हा समुद्रसपाटीपासून 3270 मीटर उंचीवर आहे. परंतु प्रत्यक्ष पायथ्यापासून त्याची उंची जास्‍त नाही. गावातून गडावर पोचण्‍यासाठी पंचेचाळीस ते साठ मिनीटे पुरतात. गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. किल्ल्यावर जाणारी वाट किल्ला डावीकडे ठेवत जाते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर पाय-या लागतात. गडावर शिरताना गुहा दिसते. त्‍या गुहेत रामाचे मंदिर आहे. गुहेच्या एका बाजूला शिलालेख कोरलेला आहे. गुहेच्या खालच्या बाजूला गार पाण्याचे एक टाके आहे.

गुहे समोरच्या तुटलेल्या पाय-या थेट गडावर जातात. त्‍यावरून पुढे गेल्यानंतर आपण गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात पोचतो. हा भाग बराचसा अरुंद आहे. गडमाथ्यावर बुजलेल्या अवस्थेतील गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते.

गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुस-या टोकाकडे जाते व डावीकडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात, मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यास काही पाय-या दिसतात. एका कड्यावर या पाय-यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो. दरवाजा पाहून मुख्‍य वाटेला आल्‍यानंतर किल्‍ल्‍याच्‍या मुख्‍य बुरूजावर उभारलेला ध्‍जस्‍तंभ दिसतो.

 या ठिकाणाहून सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर असलेला चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे पर्वत न्याहाळता येतात.

लेख :साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण ,संपर्क :9011890279

COMMENTS