बिंग फुटण्याच्या भीतीने मनसुखची हत्या ; एनआयएच्या चौकशीत उघड; तपास दुस-याकडे सोपविल्याने भीती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिंग फुटण्याच्या भीतीने मनसुखची हत्या ; एनआयएच्या चौकशीत उघड; तपास दुस-याकडे सोपविल्याने भीती

मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती नवीन माहिती लागली आहे.

जामखेडमधील तीन ग्रामपंचायतमध्ये निवडणूक रणधुमाळी सुरू
पक्षांतर व पक्षप्रवेशाच्या घावूक बाजारात फुले-आंबेडकरी चळवळ!
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतीमा राजकीय पुढार्‍याच्या फोटो खाली ठेवून आमच्या भावणा दुखावल्या बद्दल-सिरसाळा पोलिस स्टेशनला निवेदन

मुंबई / प्रतिनिधी: मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती नवीन माहिती लागली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांनी मनसुखची हत्या का घडवून आणली, याचा उलगडा झाल्याचे मानले जात आहे. ‘एनआयए’ने यासंदर्भात नुकताच एका पोलिस कॉन्स्टेबल आणि एका हॉटेल व्यावसायिकाचा जबाब नोंदवून घेतला. हे दोन्ही जबाब आणि मनसुख  यांच्या कुटुंबीयांनी दिलेली माहिती याआधारे एनआयएने सगळा गुंता सोडवला आहे. 

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. मी तुला दोन-तीन दिवसांत जामिनावर बाहेर काढेन, असेही वाझे यांनी म्हटले होते. मनसुखने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली होती. वाझे यांनी वारंवार सांगूनही हिरेन तयार नव्हता. आपण ही केस डोक्यावर का घ्यावी, असे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मनसुख हिरेन घरी निघून गेला. दरम्यानच्या काळात दोन मार्च रोजी हे प्रकरण सहायक पोलिस आयुक्त नितीन अलकनुरे यांच्याकडे सोपवण्यात आले. तेव्हा अलकनुरे स्कॉर्पिओचा मालक म्हणून हिरेनला चौकशीसाठी बोलावतील, ही बाब स्पष्ट होती. अलकनुरे यांनी हिरेनचा जबाब घेतला, तर सर्व गोष्टी समोर येतील, अशी भीती वाझे यांना वाटली. त्यामुळेच चार मार्चला विनायक शिंदे याने बनावट सिम वापरुन हिरेनला फोन केला. मी पोलिस अधिकारी तावडे बोलत असल्याचे सांगत त्याने मनसुखला घोडबंदर येथे बोलवून घेतले. त्यानंतर हिरेनची हत्या करुन त्याचा मृतदेह खाडीत फेकून  देण्यात आला. मनसुख हिरेन याने अलकनुरे यांच्यासमोर खरा जबाब नोंदवू नये, म्हणूनच वाझे यांना त्याचा काटा काढावा लागला, हे स्पष्ट झाले आहे.

हिरेन हत्याप्रकरणात 35 जणांचे जबाब

राष्ट्रीय तपास यंत्रणेने मनसुख हिरेन हत्याप्रकरणात आणखी तीन जणांचे जबाब नोंदवले आहेत. आतापर्यंत याप्रकरणात एकूण 35 जणांनी जबाब नोंदवले आहेत. तसेच शंभर कोटी रुपयांच्या वसुलीसंदर्भातही एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून काही पब, बार आणि हॉटेल मालकांचे जबाब नोंदवण्यात येणार असल्याचे समजते.

COMMENTS