Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांचे भविष्य काय?

ढेबेवाडी : राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून शेजारच्या मोठ्या शाळेत समायोजित करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर सुरू आहेत. कारण शाले

पांचगणी पालिका मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर काळा रंग टाकून हल्ला
पोथीवाद आपल्या देशासमोरील मोठं आव्हान : आ. पृथ्वीराज चव्हाण
नागरिकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांचा लाभ घ्यावा : मंगला धोटे

ढेबेवाडी : राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून शेजारच्या मोठ्या शाळेत समायोजित करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर सुरू आहेत. कारण शालेय शिक्षण विभागाने तसे पत्र शिक्षण आयुक्तांसह इतर अधिकार्‍यांना पाठवून दिले आहे. त्यामध्ये राज्यात 0 ते 20 विद्यार्थ्यांची पटसंख्येच्या किती शाळा आहेत? आणि त्या बंद करण्याबाबतची कार्यवाही कुठपर्यंत आली आहे? असा उल्लेख आहे. यावरून शासन आता राज्यातील ग्रामीण व खेड्या पाड्यातील, दुर्गम व डोंगराळ भागातील शाळा बंद करून त्या विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी करणार असल्याची चित्रे दिसून येत आहेत.
कमी पटसंख्या असल्यामुळे या शाळा सुरु ठेवणे आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्र शासनाला परवडणारे नाही. अशा शाळा बंद करण्यामागचे कारण पटण्या सारखे नाही. शिक्षण हक्क कायदा या नावाचा एक कायदा आहे. त्या काद्यानुसार 6 ते 14 या वयोगटातील प्रत्येक मुला-मुलींला शिक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. तसेच थातूर-मातूर कारणे देऊन शासन आपली जबाबदारी नाकारू शकते का? हा खरा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे गोरगरिबांच्या शैक्षणिक गंगोत्रीला बांध घालण्याचा प्रयत्न शासनाने करू नये, असे सामाजिक मत समोर येत आहे.
लहान-लहान गावे, वाड्या वस्त्या, पाडे आणि शहरातही 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या अनेक शाळा आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरण या शाळा बंद पडायला कारणीभूत आहे. राष्ट्रीय पातळीचा विचार करता पुरोगामी महाराष्ट्र आणि ज्या राज्यांना आपण मागास वा शैक्षणिक आजारी राज्ये म्हणतो त्या बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान यापेक्षाही आपल्या राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांची संख्या, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि राजस्थानपेक्षा शाळांची संख्या कमी आहेे. आपल्या राज्याची स्थिती ही बिहारसारख्या मागासलेल्या राज्यापेक्षा वाईट आहे.
सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय अंमलात आणला तर भयानक स्थिती निर्माण होऊ शकते. शासनाचे शैक्षणिक धोरण आणि मागणी पेक्षा कमी शिक्षक संख्या यामुळे दरवर्षी जि. प. शाळांची कमी होत चाललेली संख्या व पटसंख्या भविष्यात असे सुरु राहणार आहे. याचा परिणाम शिक्षक संख्या घटण्यावर व सध्या कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण होणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळणार्‍या शिक्षणाचा दर्जा सर्वात वरचा आहे. प्राथमिक शिक्षण हा पुढील शिक्षणाचा पाया आहे. प्राथमिक शिक्षण एवढे महत्त्वाचे असताना सरकार जिल्हा परिषदेच्या हजारो शाळा बंद करणार आहे. अनेक वर्षे लढा देऊन अनेक महापुरुषांच्या योगदानाने सामान्यांच्या पदरात जे पडलेले एका शासन निर्णयाने हिसकावून घेणे यात राज्याच्या हिताचे नाही.
देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात कुठल्या अधिकारी वा मंत्र्यांच्या डोक्यातून हा आत्मघाती कल्पना आली. राज्य शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास ग्रामीण, डोंगरी व दुर्गम विभागांतील तसेच गरीब घरांतील मुलांना खूप मोठा फटका बसणार आहे. हा निर्णय त्यांना शिक्षणापासून वंचित करणारा आहे. अशी भिती शैक्षणिक क्षेत्रातून व्यक्त होवू लागली आहे.

COMMENTS