कोपरगाव : शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचले पाहिजे, त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या माजी खा. स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी कोपरगाव ताल


कोपरगाव : शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचले पाहिजे, त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या माजी खा. स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. तालुक्यातील शेती आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी गोदावरी नदीवर विविध ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारून पाणी अडविण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखविली.आज त्याच विचारांचा आणि शेतकरी हिताचा वारसा आमदार आशुतोष काळे सक्षमपणे पुढे नेत असून नाटेगाव येथील गारदा नदीवरील पाण्याने भरलेला बंधारा आणि त्यामुळे शिवाराच्या तुडुंब झालेल्या विहिरी कर्मवीर शंकररावजी काळे यांचा जलव्यवस्थापनाचा वारसा पुढे नेत असल्याचे ऍड.नितीन पोळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात पोळ यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव परिसरातून वाहणाऱ्या गारदा नदीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची साखळी उभारण्यात आली आहे. मात्र, पूर्वी उपलब्ध झालेल्या अपुऱ्या निधीमुळे नदीपात्राची अपेक्षित खोली व रुंदी करता आली नव्हती. त्यामुळे बंधाऱ्यांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण होत नव्हता आणि परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा पुरेसा लाभ मिळत नव्हता.ही अडचण लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी जलसंधारण योजनेतून मागील तीन-चार महिन्यांपूर्वी निधी उपलब्ध करून दिला. त्या निधीतून गारदा नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. त्यावेळी नदीपात्रातील गाळमिश्रित माती गरजू शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आपण स्वतः सातत्याने पाठपुरावा केला. या कामासाठी आमदार आशुतोषकाळे यांनी वेळोवेळी सकारात्मक सहकार्य केले असल्याचे पोळ यांनी सांगितले.
आज या कामाचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात दिसून येत आहेत. गारदा नदी खोल आणि रुंद झाल्याने कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे.नदीपात्रातील पाण्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली असून अनेक विहिरी तुडुंब भरल्या आहेत.पावसाने काही काळ ओढ दिली असली, तरी नदी व बंधाऱ्यांमध्ये साठलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे उभ्या पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. पाण्याची उपलब्धता म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टाला मिळालेली ताकद आणि त्याच्या कुटुंबाच्या भवितव्याची हमी, ही भूमिका आमदार आशुतोष काळे यांच्या कामातून अधोरेखित होत आहे.

COMMENTS