मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांतून निवडून देण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांतून निवडून देण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान यंत्राऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पडणार असून, २२ जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
राज्यातील एकूण १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, अहिल्यानगर, ठाणे, यवतमाळ, पुणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या सहा जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता उर्वरित ११ जागांसाठीच मतदान होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, भंडारा-गोंदिया, धाराशिव-लातूर-बीड, सोलापूर, परभणी-हिंगोली, नांदेड, सांगली-सातारा, अमरावती आणि नागपूर या मतदारसंघांमध्ये एकूण ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
बहुतांश ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र असून, जळगावमध्ये चार उमेदवारांमुळे चौरंगी सामना रंगणार आहे. सोलापूर, नागपूर तसेच धाराशिव-लातूर-बीड वगळता इतर बहुताेक मतदारसंघांत बहुरंगी लढतींमुळे चुरस वाढली आहे. या निवडणुकीत संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्य अशा एकूण ७ हजार ४३ मतदारांना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणांचीही कसोटी लागणार आहे.
नाशिक आणि जळगाव या मतदारसंघांकडे विशेष लक्ष लागले आहे. नाशिकमध्ये महायुती आणि विरोधकांमध्ये थेट संघर्ष पाहायला मिळणार असून स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींमुळे निवडणुकीत उत्सुकता वाढली आहे. जळगावमध्ये चार उमेदवार मैदानात असल्याने मतविभाजनाचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातही तिरंगी लढत रंगणार आहे. येथे विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये थेट सामना होत असल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातील या निवडणुकीकडे प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून निकालातून स्थानिक पातळीवरील राजकीय ताकदीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

COMMENTS