शिर्डी : राज्यातील राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक घडामोडींमध्ये प्रभावी भूमिका बजावत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा

शिर्डी : राज्यातील राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक घडामोडींमध्ये प्रभावी भूमिका बजावत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघाला राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर झालेल्या चर्चांपासून राहुरी विधानसभा व विधानपरिषद निवडणुकांतील समन्वय आणि शिर्डी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळे निर्मिती प्रकल्पापर्यंत विविध विषयांमध्ये त्यांचे नेतृत्व ठळकपणे दिसून आल्याचे प्रतिपादन शिर्डीचे उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना शेळके म्हणाले, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेकदा सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याची भूमिका बजावली. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय समाजाप्रमाणे शैक्षणिक सुविधा व सवलती लागू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय ऐतिहासिक ठरल्याचे त्यांनी सांगितले.
राहुरी विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकांदरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडत असतानाही विखे पाटील यांनी प्रभावी समन्वय साधला. त्यामुळे राहुरी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे दोन प्रतिनिधी निवडून येण्यास मदत झाली. विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य प्राजक्त तनपुरे आणि आमदार अक्षय कर्डिले यांनीही सार्वजनिकरीत्या विखे पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याचे शेळके यांनी नमूद केले.
शिर्डी औद्योगिक वसाहतीसाठी शेती महामंडळाची सुमारे ५०० एकर जमीन हस्तांतरित करून विकासाला चालना देण्यात आली. या ठिकाणी देशातील खासगी क्षेत्रातील पहिला तोफगोळे निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून त्याच्या उद्घाटनामुळे शिर्डी मतदारसंघ राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आल्याचे त्यांनी सांगितले.
याच औद्योगिक वसाहतीत टाटा उद्योगसमूहाच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आगामी काळात या औद्योगिक वसाहतीमुळे सुमारे दहा हजार युवकांना रोजगार मिळेल, असा विश्वासही शेळके यांनी व्यक्त केला.
जलसंपदा विभागाला लोकाभिमुख स्वरूप
“जलसंपदा विभागाला अधिक लोकाभिमुख करण्याचे काम राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. गोदावरी कालवे व वितरिकांच्या नूतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली. तसेच ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेला यश मिळवून पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला गती देण्यात आली आहे,” असे अभय शेळके यांनी सांगितले.

COMMENTS