मुंबई : अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी
मुंबई : अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 5 जुलै रोजी दादर येथील हनुमान मंदिरासमोर ‘रामरक्षा आंदोलन’ आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली. या आंदोलनात सर्व हिंदू समाजबांधवांनी पक्षीय भेद विसरून सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या आणि अनास्थेच्या वातावरणाच्या मुळाशी असलेल्या प्रश्नांवर आता थेट भाष्य करण्याची वेळ आली आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांसह देशभरातील लाखो हिंदू सहभागी झाले होते. त्या संघर्षाच्या आठवणी आजही जनमानसात जिवंत असल्याचे त्यांनी नमूद केले. राम मंदिराच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्षाला देशव्यापी राजकीय बळ मिळाले आणि त्यानंतर पक्षाने व्यापक सत्ता प्राप्त केली, असे सांगत ठाकरे यांनी या विषयाशी निगडित जनभावनांचा आदर राखला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले. कारसेवकांवरील कारवाई, गोध्रा येथील घटना, त्यानंतरचे दंगलीचे वातावरण आणि विविध भागांतील सामाजिक तणाव यांचा उल्लेख करत त्यांनी हिंदू समाजाने अनेक संकटांचा सामना केल्याचे सांगितले. त्या भावनांच्या आधारावर उभे राहिलेले आंदोलन हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर त्यामागे व्यापक सामाजिक सहभाग होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
राम मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी सत्ताधार्यांवर टीका केली. राजकीय पक्षांमध्ये फूट पाडणे, लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळविणे आणि विविध राजकीय घडामोडींना विशिष्ट नाव देण्याच्या प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी, राम मंदिराच्या नावाने उभारलेल्या श्रद्धेचा वापर अन्य हेतूंसाठी होत आहे का, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे, असे म्हटले. यावेळी त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, मंदिरांशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराबाबत हिंदू समाज शांत बसणार नाही. श्रद्धास्थानांचा अपमान किंवा आर्थिक अपहार सहन केला जाणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 5 जुलै रोजी सायंकाळी दादर येथील हनुमान मंदिरासमोर होणार्या ‘रामरक्षा आंदोलनात’ स्वतः सहभागी होणार असल्याचे सांगत त्यांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या वेळी रामरक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र आणि सामूहिक प्रार्थना करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पक्षीय भूमिका बाजूला ठेवून ज्यांना राम मंदिराबाबत प्रश्न उपस्थित करायचे आहेत, ज्यांना उत्तरांची अपेक्षा आहे आणि ज्यांच्या मनात श्रद्धास्थानांविषयी आदर आहे, त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

COMMENTS