पर्यावरण वाचवण्यासाठी…

Homeताज्या बातम्यासंपादकीय

पर्यावरण वाचवण्यासाठी…

आपल्या पृथ्वीवर कोणाचीही मक्तेदारी नाही. जे कोणी प्रॉपर्टी, पैसे, पद, प्रतिष्ठा यासाठी आयुष्य जगतो त्याच्या बुद्धीला मर्यादा असते आणि जो कोणी मानवमुक

मंत्रिमंडळाचा विस्ताराचा पेच
राज्यातील वीज यंत्रणा कोलमडली
विषवृल्लीला पोसणारे कोण ?

आपल्या पृथ्वीवर कोणाचीही मक्तेदारी नाही. जे कोणी प्रॉपर्टी, पैसे, पद, प्रतिष्ठा यासाठी आयुष्य जगतो त्याच्या बुद्धीला मर्यादा असते आणि जो कोणी मानवमुक्तीसाठी विवेकाने, नीतीने जगतो, पर्यावरण- प्राणी, पशु- पक्षी यांच्या कल्याणासाठी जगतो तो खरा मानव प्राणी. आता कुणी कसे जगावे हे ज्याचा त्याचा प्रश्न. आपण आपले जीवन खऱ्या अर्थाने सर्वजण जगण्यासाठी फक्त पृथ्वीवर राहत आहोत. शेवटी त्याची किंमत आपल्यालाही मोजावी लागते. पृथ्वीने आपले जीवन सुलभ करण्यासाठी आणि या ग्रहाला राहण्यायोग्य बनवण्यासाठी दिलेल्या सर्व भेटी आहेत. जसे की हवा, सूर्यप्रकाश, पाणी, प्राणी आणि खनिजे इत्यादी. पण या संसाधनांचे माणूस शोषण करू लागला आहे. हे पृथ्वी आणि माणूस या दोघांनाही हानिकारक. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. त्यामुळे या विषयाचा उहापोह करणे क्रमप्राप्त.
आपल्या वाढलेल्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विचार न करता आपल्या नैसर्गिक संसाधनांचा अविवेकी वापर करत आहोत. माणसाला  माणसांच्या भावी पिढीचीही चिंता नाही हे यावरून सिद्ध होत आहे. पर्यावरणाच्या संसाधनांच्या संरक्षणासाठी आणि आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी प्रत्येक देशाने कायदे केले हे खरेच पण ते अमंलात येत नाहीत. कायद्याचा अंमल हा जनतेने करावयाचा असतो. त्यामुळे फक्त यंत्रणेला दोष देऊन चालत नाही. कायद्याचा अंमल करायचा नाही असे यंत्रणेने ठरवले आणि जनतेने कायदा पाळला तरी कायद्याचा उद्देश सफल होतो. आणि प्रशासनाने कायदा राबवायचा असे  ठरवले आणि तो पाळायचा नाही असे जनतेने ठरवले तर कायदा राबत नाही. त्यामुळे कायद्याच्या केंद्रास्थानी शेवटीही आणि सुरुवातीलाही माणूसच आहे.
आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन. हा दिवस वर्षातून एक दिवस जगभर साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा  करण्यामागचा मुख्य हेतू आहे. पण तो हेतू पूर्णत्वास जातोय का? पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषणविरहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न करण्याची गती आता वाढावी लागेल. पर्यावरणाच्या आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया ही पर्यावरण व्यवस्थापनाचा एक भाग आहे. यामध्ये नियोजन, विश्लेषण व मूल्यांकन यांच्या आधारे पृथ्वीवरील संसाधनांचा विचारपूर्वक उपयोग झाला पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे एका प्रदेश किंवा राष्ट्र यांची जबाबदारी नसून संपूर्ण जगाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीची आहे. भविष्यात मानवी समाजाच्या समन्यायक्षम उपयोगासाठी पर्यावरणाच्या रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. नसता जसा पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तसा माणसांचा ऱ्हास होईल हे अंतिम सत्य. त्यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा. 

COMMENTS