Homeताज्या बातम्या

सत्यजीत तांबेंचा काँग्रेससह थोरांताना दे धक्का !

नाशिक पदवीधरमध्ये तांबे पिता-पुत्राच्या खेळीमुळे काँगे्रसची नाचक्की काँगे्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिले कारवाईचे संकेत

अहमदनगर/नाशिक ः नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला. उमेदवारी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्

रेमडीसीवीर…काहींना कोटा सिस्टीमने तर काहींना सहज मिळतात
योगिता खेडकर व हर्षदा गरुड यांची वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी निवड
श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार

अहमदनगर/नाशिक ः नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला. उमेदवारी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप बघायला मिळाला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेत, त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे काँगे्रसची नाचक्की झाली असून, सत्यजीत तांबे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सत्यजीत तांबे हे सुरुवातीपासूनच इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडे तशी मागणीही केली होती. त्याचवेळी, भाजपच्या नेत्यांशीही त्यांची समांतर बोलणी सुरू असल्याची चर्चा होती. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वावर दबाव होता. मात्र, हा दबाव झुगारून काँग्रेसने सत्यजीत यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. गुरुवारी सकाळी डॉ. सुधीर तांबे काँगे्रसचे अधिकृत उमेदवार असल्याचा एबी फॉर्म घेऊन नाशिकला रवाना देखील झाले होते. मात्र ऐनवेळी पक्षाला आणि वरिष्ठांना कोणतीही माहिती न देता डॉ. तांबे यांनी माघार घेतली. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर आपल्यासमोर सर्व राजकीय पक्षाचे पर्याय समोर ठेवले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सत्यजीत तांबे सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते. त्यांनी यापूर्वी अहमदनगर शहरामधून देखील विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्यासमोर सुरक्षित मतदारसंघ नव्हता. त्यामुळे यंदा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची पक्षासमोर इच्छा व्यक्त करून देखील पक्षाने वडिलांनाच उमेदवारी दिल्यामुळे तांबे नाराज होते. त्यांनी गुुरुवारी सकाळीच ट्विट करत सूचक इशारा दिला होता. त्यात म्हटले होते की, शक्य तितकी जोखीम घ्या, जिंकलात तर नेतृत्व कराल. हरलात तर मार्गदर्शन कराल, असे ट्विट केल्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढण्यात येत होते. तांबे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. मात्र ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संगमनेरमध्ये थोरात-तांबे कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.  

दरम्यान, तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला. तसेच तांबे पिता पुत्रांनी केलेल्या राजकीय खेळीवर त्यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र आमचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून, पुढील निर्णय घेणार असल्याचे पटोले यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

पक्षाने कारवाई केल्यास तांबेसमोर सर्व राजकीय पक्षाचे पर्याय – काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. सुधीर तांबे यांनी माघारघेतल्यानंतर संताप व्यक्त केला. तसेच तांबे पिता-पुत्रावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत दिले. त्यामुळे जर बाळासाहेब थोरात यांनी यातून मार्ग काढला नाही तर, पक्षाकडून निलंबनाची कारवाई होऊ शकते. अशावेळी सत्यजीत तांबे यांनी आपल्यासमोर एकप्रकारे सर्वच राजकीय पक्षाचे पर्याय समोर ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षाने कारवाई केल्यास सत्यजीत तांबे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे देखील बोलले जात आहे.

भाजपच्या पाठिंब्यासाठी फडणवीस यांची भेट घेणार ः सत्यजीत तांबे
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मीच लढवावी अशी काँगे्रसच्या नेतृत्वाची आणि पक्षश्रेष्ठींचीही इच्छा होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे बाबांच्या नावाची घोषणा झाली. आता मीच ही निवडणूक लढवणार आहे. मी अनेक वर्षांपासून राजकीय व सामाजिक जीवनात कार्यरत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी मला पाठिंबा द्यावा असा माझा प्रयत्न असेल. त्यासाठी आपण भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सत्यजीत तांबे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

भाजपला पाठिंबा मागितल्यास देणार ः बावनकुळे नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी जर सत्यजीत तांबे यांनी भाजपला पाठिंबा मागितला तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करु. तांबे यांचे नाव भाजपकडून जाहीर करण्यात येणार होते, त्यांचे नाव दिल्लीपर्यंत पाठवल्याची चर्चा होती. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, नाही आम्ही या निवडणुकीसाठी अजूनही कुठलेही नाव पाठवलेले नाही. राजेंद्र विखेंचे नाव आम्ही पाठवणार होतो. त्यांनीच निवडणूक लढावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. राधाकृष्ण विखे पाटलांनी यासाठी पुढाकार घेतला होता, असे देखील बावनकुळे यांनी सांगितले.

बाळासाहेब थोरातांना ठेवले अंधारात – काँगे्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी महसूलमंत्री असलेले बाळासाहेब थोरात यांचे आणि सत्यजीत तांबे यांचे मामा-भाचे असे नाते आहे. मात्र भाच्याने बंडखोरी केल्यामुळे थोरातांसमोर मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. तसेच तांबे यांनी बंडखोरी केल्यामुळे कौटुंबिक संघर्ष बघायला मिळत आहे. थोरातांसह काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांना न कळवता तांबे पिता-पुत्रांनी काँगे्रसची नाचक्की करत, ऐनवेळी तांबे यांनी माघार घेतली. तर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. बाळासाहेब थोरातांना न कळवल्यामुळे कौटुंबिक संघर्ष बघायला मिळत असून, सत्यजीत तांबे यांनी आपल्यासमोरचे सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.

COMMENTS