पिंपळनेर: केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२६ साठीची नोंद
पिंपळनेर: केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२६ साठीची नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ आहे. पीक विमा योजनेची मुदत संपण्यासाठी आता अवघे दोन दिवस उरले असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अचानक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलै या विहित मुदतीत आपली नोंदणी पूर्ण करावी, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
योजनेच्या प्रमुख अटी व नियम:
- नोंदणीसाठी ‘ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी’ (AgriStack Farmer ID) असणे बंधनकारक आहे.
- पीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी डिजिटल पीक पाहणी (पीक पाहणी ॲप) द्वारे पिकांची अचूक नोंद करणे आवश्यक आहे.
- पीक विमा काढण्यासाठी प्रतिअर्ज किमान ०.१० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.
- भाडेपट्टीवरील शेतीसाठी नोंदणीकृत भाडेकरार आणि सामाईक खातेदारांचे संमतीपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
- बनावट ७/१२, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा अकृषक (एन.ए.) जमिनीवर पीक विमा काढल्याचे आढळल्यास संबंधित अर्जदारास कृषी विभागाच्या सर्व डीबीटी (DBT) योजनांमधून पुढील पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात येईल, असा गंभीर इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
बीड तालुक्यात खरीप हंगामातील कापूस, कांदा, सोयाबीन, तूर, भुईमूग, मका आणि बाजरी या प्रमुख पिकांसाठी हे विमा संरक्षण उपलब्ध आहे. शेतकरी आपल्या जवळच्या सीएससी (CSC) केंद्रात, पोस्ट कार्यालयात, बँक शाखेत किंवा थेट ‘क्रॉप इन्शुरन्स’ पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी कृषी रक्षक हेल्पलाइन १४४४७ वर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

COMMENTS