Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा

22 हजार खारफुटीची झाडे तोडण्यास हायकोर्टाची सशर्त परवानगी

मुंबई प्रतिनिधी - मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे.  मुंबई, पालघर आणि ठाणे या पट

चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार
संजीवनीचा संघ व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्यात प्रथम
सीपीआरच्या नूतन अधिष्ठाता पदी डॉ. प्रदीप दीक्षित

मुंबई प्रतिनिधी – मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे.  मुंबई, पालघर आणि ठाणे या पट्ट्यातील 22 हजार खारफुटीची झाडे तोडण्यासाठी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे या महामार्गातील एक अडसर दूर झाला आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.


 सार्वजनिक हितासाठी ही परवानगी दिली जात असल्याचे स्पष्ट करत या खारफुटी तोडल्यामुळे होणारी नुकसानाची भरपाई म्हणून 2.5 लाख रोपांची लागवड करण्याची अट हायकोर्टाने कंपनीला घातली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने आपला राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी जाहीर केला. एनएचआरसीएल कंपनीची खारफुटीची झाडे तोडू देण्याची मागणी मान्य करताना हायकोर्टाने त्यांना पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं दिलेल्या मंजुरीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींचे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.


 दरम्यान, प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्यातील कांदळवन तोडण्याची परवानगी मिळालेली नाही, असा दावा करत बॉम्बे एन्व्हायर्नमेंट अ‍ॅक्शन ग्रुप या संस्थेच्यावतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ज्यात झाड कापण्याची परवानगी न देण्याची मागणी करण्यात आली होती. प्रकल्प उभारणीसाठी काही ठिकाणी केमिकल स्फोटकांचा वापर करण्यात येणार आहे. मात्र, तो परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश (इको सेंन्सिटिव्ह झोन) मध्ये मोडतो. याशिवाय तिथे उभारण्यात येणारे ठाणे स्थानक हे मुळात ठाणे जिल्ह्याच्या बाहेर आहे. ठाण्यातील हा परिसर फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी आरक्षित आहे. या प्रकल्पामुळे त्याचंही नुकसान होणार आहे. बुलेट ट्रेन मार्ग ज्या आरक्षित वनक्षेत्रातून जाणार आहे त्यासाठी वन संवर्धन कायद्यांतर्गत यापूर्वी कोणतीही मंजुरी घेण्यात आली नाही तसेच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून आवश्यक परवानग्यांविषयी तपशीलही सादर केलेला नाही. याच संस्थेच्या मूळ याचिकेवर निर्णय देताना भविष्यात सार्वजनिक प्रकल्पासाठीही खारफुटी तोडायची असल्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी अनिवार्य केलेली आहे. हायकोर्टाच्या या निर्णयाला संस्थेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे, यासाठी स्थगिती देण्याची मागणी हायकोर्टाकडे केली होती, मात्र ती नाकारण्यात आली आहे.

पालघर येथील हजारो कांदळवन तोडली जाणार – केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मुंबई-अहमदाबाद ’बुलेट ट्रेन’ प्रकल्प आहे. 508 किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा 155 कि.मी लांबीचा पट्टा हा महाराष्ट्रातून जात आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील 21 ते 23 कि.मी लांबीच्या जागेवरील कांदळवन तोडणे आवश्यक होते. त्यानुसार या प्रकल्पासाठी मुंबई, ठाणे, पालघर येथील हजारो कांदळवन तोडली जाणार असून ठाण्यातील हरितपट्टाही प्रभावित होणार आहे. परंतु हा एक सार्वजनिक प्रकल्प असल्याने केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने खारफुटीची झाडे तोडण्यास परवानगी दिली होती. यापूर्वी 53 हजार 467 खारफुटी तोडण्यात येणार होती, मात्र हा आकडा नंतर 21 हजार 997 एवढा कमी करण्यात आल्याची माहिती हायकोर्टाला देण्यात आली.

COMMENTS