मोरबीची दुर्घटना : मानवी जीवन मूल्ये पायदळी !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

मोरबीची दुर्घटना : मानवी जीवन मूल्ये पायदळी !

    कालच दक्षिण कोरियातील सेऊल मधील दुर्घटनेवर लिहीलेल्या सदराची शाई वाळत नाही, तोच आज गुजरात च्या मच्छू नदीवरील मोरबी हा पर्यटकांचे आकर्षण

न्यायपालिकेचा अनावश्यक हस्तक्षेप !
लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक कधी ?
समान संहितेची प्रयोगभूमी : उत्तराखंड !

    कालच दक्षिण कोरियातील सेऊल मधील दुर्घटनेवर लिहीलेल्या सदराची शाई वाळत नाही, तोच आज गुजरात च्या मच्छू नदीवरील मोरबी हा पर्यटकांचे आकर्षण असलेला झुलता पूल कोसळून जवळपास १४० लोकांना जीव गमवावा लागला. आश्चर्य म्हणजे हा पूल ७ महिन्यांपासून दुरूस्तीसाठी बंद होता. मात्र, दुरूस्ती झाल्याचे जाहीर करून अवघ्या पाच दिवसांपूर्वी हा पूल पर्यटकांसाठी खुला केला होता. एकशे चाळीस वर्षे जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याचे काम ओरेवा या कंपनीला देण्यात आले होते. परंतु, दुरूस्तीचे काम करणाऱ्या ओरेवा कंपनी आणि इतर जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम  ३०४, ३०८, आणि ११४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली. मोरबीच्या या ऐतिहासिक पुलाच्या दुरुस्ती आणि देखभालीचं टेंडर नुकतंच ओरेवा नावाच्या कंपनीला मिळालं होतं. निविदेतील अटींनुसार कंपनीने दुरुस्तीनंतर पुढील १५ वर्षे पुलाची देखभाल आणि निगा राखायची जबाबदारी होती. परंतु, अवघ्या पाच दिवसात कोसळणारा हा पूल ऐन दिवाळीच्या सुटीत एन्जॉय करणाऱ्या कुटुंबियांना असा शेवटचा श्वास घ्यायला लावणारा असेल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल! दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, या पुलावर जाण्यासाठी जवळपास सातशे लोकांना तिकीटं दिली गेली होती. पुलाच्या एकूण क्षमतेच्या चार पट जास्त तिकीटं दिली गेली होती. यामुळे पुलावर मोठी गर्दी झाली होती आणि क्षमतेपेक्षा जास्त लोक यावेळी याठिकाणी होते, अशी मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्थात, अशा प्रकारचा युक्तिवाद हा एखाद्या बलाढ्य कंपनीला वाचवण्याच्या उद्देशाने नसेल, असे म्हणता येत नाही. कोणत्याही क्षेत्रात काम करताना माणूस आणि त्याची जीवनमूल्ये ही जपली गेली पाहिजे. ज्यांच्या आनंदासाठी एखाद्या बाबीची निर्मिती केली जाते, त्याच गोष्टीने माणसांचा जीव घ्यावा ही गोष्ट फारच धक्कादायक असते. वर्षेभर कामात असणारे पालक, वर्षभर शाळेत जाणारी पाल्य आणि त्या त्या कुटुंबातील गृहीणी यांच्यासाठी शालेय सुट्ट्यांचा काळ थोडासा विरंगुळा असतो. जीवनात विरंगुळाच्या क्षणीच जीवन संपावे, एवढी भीषण बाब अन्य दुसरी नाही. या दुर्घटनेत जवळपास एकशे चाळीस लोकांना प्राण गमवावा लागला असला तरी, ही संख्या वाढण्याचा धोका आहेच. पुलाची दुरुस्ती नुकतीच झाली असल्याने अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडेल, याची कुणालाच कल्पना नसेल. शिवाय पर्यटनाच्या ठिकाणी शालेय सुट्यांच्या काळात गर्दी होतेच. त्यामुळे, एखाद्या ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होणे अनपेक्षित नसते. कारण, पर्टनाच्या क्षेत्रात तेजी आणि मंदी म्हणजे सामान्य काळ आणि व्यावसायिक काळ असे ढोबळ वर्गीकरण केले जाते. त्याच अनुषंगाने पर्यटन स्थळांची काळजी घ्यावी लागते. मात्र, मोरबी पूल या झूलत्या पुलावर अशाप्रकारे कोणतीही काळजी घेतली गेली नसावी. या पुलाच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील अकरा जण दगावल्याची धक्कादायक बाबही समोर आली. परंतु, काही घटक या दुर्घटनेला पर्यटक म्हणून आलेल्या तरूणांना दोषी ठरवू पाहत आहेत. मात्र, असा दोषारोप करणे हे संबंधित कंपनीला वाचवण्याचा प्रकार म्हणावा लागेल. कारण, तरूण जेथे पर्यटनाला जाणार तेथे उत्साह तर असणारच! तारूण्य आणि उत्साह यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे, तरूणांच्या उर्जायुक्त मानसिकतेला दोष देऊ नये; त्याऐवजी देखभाल करणाऱ्या कंपनीची नेमकी काही चूक झाली आहे का? हे तपासणे आवश्यक आहे.

COMMENTS