नांदेड : खरीप हंगामाची चाहूल लागताच जिल्ह्यातील शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळू लागले आहेत. याच पार्

नांदेड : खरीप हंगामाची चाहूल लागताच जिल्ह्यातील शेतकरी बी-बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर बनावट बियाणे व खतांच्या विक्रीची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. कृषी निविष्ठा खरेदी करताना आवश्यक ती खबरदारी घेतल्यास आर्थिक नुकसान आणि भविष्यातील अडचणी टाळता येऊ शकतात, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी कोणतीही खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्की पावती घेणे अत्यंत आवश्यक आहे. या पावतीवर बियाण्याचा लॉट नंबर, बॅच नंबर, कंपनीचे नाव आणि खरेदीची तारीख स्पष्टपणे नमूद असावी. बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत पुढे काही वाद निर्माण झाल्यास ही पावती महत्त्वाचा पुरावा ठरते. तसेच, बियाणे खरेदी करताना त्याचे पाकीट पूर्णपणे सीलबंद आणि मोहरबंद असल्याची खात्री करावी; फाटलेले किंवा पुन्हा शिवलेले पाकीट खरेदी करणे टाळावे.
पेरणीनंतरही पुरावे सांभाळून ठेवा: पेरणी झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी बियाण्यांची रिकामी पिशवी, टॅग, वेष्टन आणि खरेदीचे बिल पीक कापणीपर्यंत सुरक्षित जपून ठेवावे. भविष्यात तक्रार दाखल करण्याची वेळ आल्यास हे पुरावे कामी येतात. याशिवाय कृषी विभागाने घरच्या घरी १०० दाणे ओल्या कापडावर ठेवून उगवणक्षमता तपासण्याचा सल्ला दिला आहे. ७० टक्क्यांपेक्षा कमी दाणे उगवल्यास ते बियाणे पेरणीसाठी वापरू नये. कमी दराच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत आणि परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

COMMENTS