Homeताज्या बातम्यासंपादकीय

अमली पदार्थ आणि महाराष्ट्र

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. हा अमली पदार्थ लाखो तरूणांचे भविष्य अंधकारात लोटत

क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णकाळ…
वचननामा आणि पूर्ती
सत्ता संघर्षाचा पेच आज सुटणार का ?

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. हा अमली पदार्थ लाखो तरूणांचे भविष्य अंधकारात लोटतांना दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी धारावी आणि दहिसर भागातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. यात एमडी ड्रग्ज आणि हायड्रोपोनिक वीडचा (गांजा) समावेश आहे. या पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 5 कोटी रूपये इतकी आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रात ललित पाटील प्रकरण चांगलेच गाजतांना दिसून येत आहे. ललित पाटील हा ड्रग्जतस्कर ससूनमध्ये उपचाराच्या नावाखाली तळ ठोकून होता. यासाठी ससूनच्या अधिष्ठाताना एका दिवसांपोटी बरेच लाख रुपये मोजण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचबरोबर ललित पाटीलच्या अटकेनंतर छत्रपती संभाजीनगर, पालघर, नाशिकसह अनेक जिल्ह्यात ड्रग्जचे कारखाने सापडल्यामुळे खळबळ होती. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात या ड्रग्जचे जाळे विणण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी रोखण्याची गरज आहे, त्यासाठी ड्रग्जचे कारखाने उद्धवस्त करण्याबरोबर त्यांना अभय देणारे कोण, याची मुळे शोधण्याची खरी गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरून राज्या-राज्यांमध्ये ड्रग्जचे जाळे विणण्यात येत आहे. वास्तविक पाहता अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याशी पाकिस्तान आणि चीन या देशांनी जवळीक साधली आहे. तसेच तालिबान्यांनी सत्ता हातात घेतली असली, तरी देश चालवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा प्रमाणात पैसा नाही. तसेच अशा आर्थिक कोंडीमध्ये देश चालवणे अवघड आहे. शिवाय अफगाणिस्तानमध्ये विविध देशांनी करोडो रुपयांची गुतंवणूक करत, विविध प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली होती. मात्र तालिबान्यांनी सत्ता स्थापन करताच, हे प्रकल्प बंद पडले असून, विविध देशांनी आपला गाशा गुंडाळला आहे. अशा परिस्थितीत तालिबान्यांनी पुन्हा एकदा अमली पदार्थांचा व्यवसाय सुरू केला आहे. भारताची बाजारपेठ मोठी असल्यामुळे अमली पदार्थांचा साठा मोठया प्रमाणात भारतात येत आहे. अमली पदार्थांच्या तस्करीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने म्यानमार, थायलंड आणि लाओस हे देश ‘गोल्डन ट्रायँगल’ तर इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना ‘गोल्डन क्रेसेन्ट’ संबोधले आहे. या देशांमध्ये अफूची शेती मोठ्या प्रमाणात होते. या चक्रव्यूहात भारताची हद्द अडकल्याने अमली पदार्थांच्या तस्करीला मोकळे रान मिळाले आहे. महाराष्ट्रातच विविध ठिकाणी पोलिसांनी आणि नॉकोटिक्स विभागाने टाकलेल्या छाप्यात मोठया प्रमाणात ड्रग्ज, तर कुठे चरस, हेरॉईन यासारखे कोटयावधी रुपयांचे अमली पदार्थ सातत्याने सापडत आहे. त्यांच्याकडून विविध राज्यात ललित पाटीलसारखे ड्रग्ज तस्कर तयार करण्यात येत आहे. असे तस्कर, भारताची एक पिढी उद्ववस्त करू पाहत आहे. याला वेळीच रोखणे आवश्यक आहे. आणि त्याच दृष्टीने केंद्र सरकारने पावले टाकत सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफला पाकिस्तानच्या सीमेपासून 50 किलोमीटरच्या आत छापे टाकणे, अटक करणे, चौकशी करणे असे अधिकार दिले आहेत. याचा मुख्य उद्देश म्हणजे, अंमली पदार्थांचे रॅकेट मोडून काढणे. बीएसएफच्या अधिकार्‍यांना पश्‍चिम बंगाल, पंजाब आणि आसाममध्ये देशाच्या सीमेपासून 50 किमी पर्यंतच्या भागात तपास, अटक आणि जप्तीची परवानगी मिळाली आहे. त्यातून सीमवरील भागातून येणार्‍या ड्रग्ज तस्करीला आळा बसणार आहे. अलीकडच्या काही वर्षांत मुंबई-पुणे सारख्या मोठया शहरात अशा पार्टया, मौजमस्ती करण्याचे पेव वाढत चालले आहे. याला कुठेतरी अटकाव घालण्याची गरज आहे.  

COMMENTS