बीड : बीड शहरातील भालदारपुरा परिसरातील शांहीशाह वली दर्गा व रेशमवाला कब्रस्तान समोर वाढलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केल

बीड : बीड शहरातील भालदारपुरा परिसरातील शांहीशाह वली दर्गा व रेशमवाला कब्रस्तान समोर वाढलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष शेख रमीज अहमद यांनी नगरपरिषद मुख्याधिकार्यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शांहीशाह वली दर्गा परिसरातील काही व्यक्तींनी कब्रस्तानच्या आजूबाजूला पुन्हा अतिक्रमण केले आहे. यापूर्वी नगरपरिषद प्रशासनाने कारवाई करून हे अतिक्रमण हटवले होते, मात्र आता पुन्हा नव्याने अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, संबंधित ठिकाणी काही व्यक्तींकडून बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. या परिसरात गांजा व नशा निर्माण करणार्या औषधांची विक्री यांसारखे गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे शेख रमीज अहमद यांनी म्हटले आहे. सदर अतिक्रमण तात्काळ हटवून परिसर मोकळा करण्यात यावा, तसेच संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

COMMENTS