Homeताज्या बातम्यादेश

बचावात्मक कार्य युद्धपातळीवर सुरू

बोगद्यातील 41 कामगारांची 9 दिवसांनंतरही सुटका नाही

नवी दिल्ली ः उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यात गेल्या 9 दिवसांपासून अडकलेल्या 41 कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. यु

राजूशेठ देशपांडे यांना टाटा उद्योग विकास पुरस्कार
राहुरीत ठेकेदाराच्या घरी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल
’अग्निवीर’ विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली ः उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यात गेल्या 9 दिवसांपासून अडकलेल्या 41 कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. युद्धपातळीवर बचाव मोहीम सुरू असली तरी, अजूनही या मोहीमेला यश आलेले नाही. कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बोगद्यावरील टेकडीला उभा छेद देऊन ‘प्रवेश मार्ग’ तयार करण्याचे कामसुरू करण्यात आले.
हिमालयाच्या पर्वतराजीतील माती एकसमान नसल्यामुळे खोदकाम, पर्यायाने बचावकार्य आव्हानात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अडकलेल्या कामगारांना पुरेसे अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी सकाळी ढिगार्‍यातून 42 मीटपर्यंत मोठया व्यासाच्या नलिका टाकण्यात आल्या आहेत, असे तेथील नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांनी सांगितले. सद्यस्थितीची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य आणि केंद्रीय यंत्रणा परस्पर समन्वयाने आणि तत्परतेने मदत आणि बचाव कार्यात व्यस्त आहेत. बोगद्यात अडकलेले कामगार सुरक्षित असून ऑक्सिजन, पौष्टिक अन्न आणि पाणी पुरवले जात आहे. तज्ज्ञांचे मत घेऊन एजन्सी मदत आणि बचाव कार्य करत आहेत.

बचाव मोहिमेबद्दल अधिक माहिती देतांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून ते बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवून आहे. तेथे वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे. बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुखरूप असून त्यांना लवकर बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आत्तापर्यंत पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून तीन वेळा परिस्थितीची माहिती घेतली आहे. पीएमओ टीमनेही घटनास्थळाची पाहणी केली असून ते सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि समन्वयाचे काम करत आहे. अडकलेल्या कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्याशी सतत संवाद साधून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशनाची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येथे येऊ इच्छिणार्‍या कामगारांच्या कुटुंबाचा वाहतूक, भोजन, निवास आणि मोबाईल रिचार्जचा खर्च उत्तराखंड सरकार उचलणार आहे. या आपत्तीच्या काळात आपण सर्वांनी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल जपले पाहिजे.

पंतप्रधान मोदींनी घेतली बचावकार्याची माहिती- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून उत्तरकाशीतील सिल्क्यराजवळ बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्र सरकारकडून आवश्यक बचाव उपकरणे आणि संसाधने पुरविली जात आहेत. केंद्र आणि राज्य संस्थांच्या परस्पर समन्वयाने कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य राखण्याची गरज आहे.

COMMENTS