कोपरगाव : राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक मार

कोपरगाव : राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक मार्गांवर लांब पल्ल्याच्या बस लहान थांब्यांवर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे. बसमध्ये जागा शिल्लक असतानाही विद्यार्थ्यांना प्रवासासाठी न घेणे अत्यंत चुकीचे असून, ही परिस्थिती न सुधारल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी मला स्वतः बस अडवावी लागेल, असा सूचक इशारा आमदार आशुतोष काळे यांनी एसटी प्रशासनाला दिला आहे.
कोपरगाव बस आगारात नव्याने दाखल झालेल्या पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार काळे म्हणाले की, कोपरगाव आगारातील अपुऱ्या बसगाड्यांमुळे ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या विस्कळित झाल्या होत्या. या समस्येबाबत शासन स्तरावर सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या सव्वा वर्षात कोपरगाव आगाराला आधी १० नवीन ‘लालपरी’ आणि आता ५ ‘राजमाता जिजाऊ’ अशा एकूण १५ नवीन बस मिळाल्या आहेत.
या नवीन बसगाड्यांमुळे कोपरगाव परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कोपरगाव आगारात इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ‘ई-बस’ देखील सेवेत दाखल होतील, अशी माहिती त्यांनी दिली. या लोकार्पण सोहळ्यास आगारप्रमुख अमोल बनकर, वाहतूक निरीक्षक अमित हांपे, आगार लेखापाल मिलिंद कोपरे यांच्यासह मान्यवर व एसटी कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS