Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जोरदार पावसाने बळीराजा सुखावला

राज्यभर मुसळधार पावसाचा तडाखा

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात शुक्रवारी सर्वदूर जोरदार पावस पडल्यामुळे काही प्रमाणांत पिकांना जीवदान मिळतांना दिसून येत आहे, त्यामुळे बळीराजा  सुखावल्

हैदराबादमध्ये पावसाचा धुमाकूळ
Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी
संगमनेर तालुक्यात मुसळधार पाऊस

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात शुक्रवारी सर्वदूर जोरदार पावस पडल्यामुळे काही प्रमाणांत पिकांना जीवदान मिळतांना दिसून येत आहे, त्यामुळे बळीराजा  सुखावल्याचे चित्र होते. राज्यात आतापर्यंत ओढ्या-नाल्यांना पूर येईल, असा पाऊसच न झाल्याने पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता. राज्य दुष्काळाच्या छायेत असतांना, शुक्रवारपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजाच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.
मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. परिणामी नदी-नाले आणि ओढ्यांना पूर आला असून नागरिकांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे. गेल्या 10 ते 12 तासांमध्ये अहमदनगर, पुणे, मुंबईसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड आणि विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. महिन्याभराच्या खंडानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण, कन्नड, सिल्लोड आणि सोयगाव या तालुक्यांमध्ये देखील मागच्या 10 ते 11 तासांपासून पावसाने मुक्काम करत जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यात देखील गुरुवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ चार तासांत 97 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात वरुणराजाने हजेरी लावल्याने कापूस, मका आणि सोयाबीन या पिकांना जीवदान मिळाले आहे. राज्यातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील काही तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. कोकणासह मुंबईतील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याची माहिती आहे. येत्या एक ते दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, धुळे, धाराशीव, लातूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. मुसळधार पावसामुळे पुण्याच्या ग्रामीण भागातल्या अनेक नदी-नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळे वरुणराजाचे पुनरागमन झाल्याने आनंद व्यक्त करावा की पावसामुळे शेतीचे नुकसान झाले, याचा शोक व्यक्त करावा, असा प्रश्‍न पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. आंबेगाव तालुक्यातील काठापूर मध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. परिणामी अनेक शेतातील बांध फुटले असून उभी पीकं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

भंडार्‍यात तीन तास ढगफुटी सदृश्य पाऊस – भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावलेली असतानाच शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपासून तब्बल साडेबारा वाजेपर्यंत अक्षरश: ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. तब्बल तीन तासापर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने भंडारा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे. तुमसर आणि मोहाडी या दोन तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. यामुळे तुमसर शहरातील मुख्य मार्गावरून पावसाचे पाणी वाहू लागल्याने सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले.

COMMENTS