Homeताज्या बातम्यासंपादकीय

समतेच्या विचारांचे पाईक

आज आषाढी एकादशी अर्थात वारकर्‍यांचा मेळा. आयुष्यभर समतेची शिदोरी जवळ बाळगणारा हा वारकरी वर्ग दरवर्षी भक्तीभावाने आपल्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठ

सरकारी निर्णय राज्यास मारक
विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक !
काँगे्रस-ठाकरेंतील कुरघोडीचे राजकारण

आज आषाढी एकादशी अर्थात वारकर्‍यांचा मेळा. आयुष्यभर समतेची शिदोरी जवळ बाळगणारा हा वारकरी वर्ग दरवर्षी भक्तीभावाने आपल्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरमध्ये एकत्र जमतो. ऊन, वारा, पाऊस, अन्न, कोणतीही भ्रांत न बाळगता, होणारी गैरसोयीकडे दुर्लक्ष करून हा भक्त पांडूरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेला असतो. ही ओढ त्याला शांत बसू देत नाही. एकदा का आपल्या लाडक्या पांडूरंगाचे दर्शन झाले की, त्याचे मन हलके होते. वास्तविक पाहता हा बहुजनांचा मेळा, आयुष्यभर समतेच्या विचारांचे पाईक आहेत, समतेच्या विचारांचे वाहक आहेत. कारण विठ्ठलाने कधीही आपल्या भक्तांमध्ये भेदाभेद केला नाही. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ ही संतांची शिकवण आत्मसात करणारा वारकरी ही समतेची दिंडी आपल्या निष्ठेने पुढे नेतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रातील वारकर्‍यांचे आपल्या विठूरायाशी एक अनोखे नाते आहे. कारण सर्वाधिक भक्त, भाविक हे विठ्ठलांना आपला उपास्य दैवत मानतात. महाराष्ट्रातील विविध, जाती आणि धर्मातील भाविक विठ्ठलाशी आपले नाते सांगतात. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा-म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस-श्रीविठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी ह्या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात. तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वार्‍या प्रमुख मानल्या जातात.

त्यांतही आषाढीला महत्त्व विशेष आहे. ज्यांना वर्षातून एकदाच-म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला-येणे शक्य असते, त्यांनी तसे केले तरी चालते; परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे, ही वारकर्‍यांची मुख्य साधना होय. आणि वारकरी आपला हा शिरस्ता नेहमीच पाळतांना दिसून येत आहे. वारकरी संप्रदायाला जी अमाप लोकप्रियता मिळाली, ती लोकप्रियता मिळण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे सर्वसामान्यांशी ह्या पंथाने अत्यंत जिव्हाळ्याचे नाते जोडले उत्कट  भक्ति, सदाचार, नीती ह्यांवर आधारलेला सरळमार्गी आचारधर्म  ह्या संप्रदायाने सांगितला. कर्मकांडांना थारा दिला नाही. वारकर्‍यांची विठ्ठलभक्ती ही प्रवृत्तिपर आहे. कारण वारकर्‍यांनी चातुवर्ण्य व्यवस्था स्वीकारली नाही तर, त्यांनी समतेचा वारसा स्वीकारला. आणि या मानवजातीतील प्रत्येकाला ईश्‍वराची भक्ती करण्याचा हक्क आहे, हा समतेचा विचार वारकरी संप्रदानाने महाराष्ट्रात वाढवला आणि रूजवला. वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये संतानी समतेची चळवळ निर्माण केली. त्यामुळे या चळवळीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अनेक शतकांपासून वारकरी नित्यनेमाने वारी करतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता वारकरी संप्रदायापूर्वी झालेल्या विविध संप्रदायांनी घातलेल्या पायावरच मध्ययुगीत महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची  सुरूवात संत नामदेव यांनी केला. परंतु त्याचा उद्य नंतरच्या काळात झाला. वारकरी संप्रदायातील बहुसंख्य संत हे मराठवाड्यातील असल्याचे दिसून येतात. पंढरपूरच्या चौर्‍याऐंशीच्या शिलालेखात यादवांचा मुख्य प्रधान हेमाद्रीपंडित आणि  नृपती रामदेवराय यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला देणगी दिल्याचे पुरावे सापडतात. तर मालूतारण या ग्रंथात पांडुरंग मूर्तीचा इतिहास शालीवाहन शकांच्या प्रारंभापासून आढळतो. त्यामुळे वारकरी संप्रदायाला अनेक दशकांचा इतिहास असून, महाराष्ट्रावर अनेक राजे-रजवाड्यांचे आक्रमण झाले तरी, ते वारकरी चळवळीला मोडीत काढू शकले नाही. हेच या वारकरी चळवळीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. वारकरी संप्रदाय हा कोणा एका जातीपुरता मर्यादित नव्हता, तर या संप्रदायाने सर्व जातीधर्मातील लोकांना भक्तीचा मार्ग मोकळा करून अठरापगड जातींचे संत भेदवार विसरून सर्वांना भक्तीच्या एकाच छताखाली आणण्याचे महत्वाचे काम केले. त्यामुळे वारकरी हा खर्‍या अर्थाने समतेचा पाईक असून समतावादी विचारांचा वाहक आहे. 

COMMENTS