अपयशी ठरल्यास राजकीय सन्यास घेणार :  देवेंद्र फडणवीस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपयशी ठरल्यास राजकीय सन्यास घेणार : देवेंद्र फडणवीस

काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. परंतु, भाजप कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण मिळवून देणारच.

राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु.२५५५ कोटी विमा नुकसान भरपाई 
जुन्या उपकेंद्राचे आणि वाहिन्यांचे सर्वेक्षण करून कामे सुरू करा : जलसंपदा मंत्री विखे पाटील
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नागपूर : काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. परंतु, भाजप कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण मिळवून देणारच. यात अपयश आले तर राजकीय सन्यास घेईन, अशी घोषणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केले. स्थानिक व्हेरायटी चौकात फडणवीस यांच्या नेतृत्वात शनिवारी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.  

    यावेळी फडणवीस म्हणाले की, ओबीसी आरक्षण रद्द होणे हे राजकीय कारस्थान आहे. आघाडी सरकार आणि सरकारमधील धुरीणांनाही फेब्रुवारीत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपर्यत ओबीसी आरक्षण होऊ द्यायचे नाही. एकदा असा पायंडा पडला की पुढे ते होण्याची शक्यता धुसर होत जाते. मग या नंतरच्या सर्वच निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडतील. आघाडी सरकारमधील ओबीसी मंत्र्यांना काडीचीही किंमत नसल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. काँग्रेसच ओबीसी आरक्षणाची खरी मारेकरी आहे. वाशिम जिल्ह्यातील काँग्रेस आमदाराचा मुलगा व भंडारा जिल्हा काँग्रेसाध्यक्षानेच नागपूर उच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटीशन दाखल केली. या दोघांचीही काँग्रेस कार्यालयात ऊठबस व वावर आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही काढलेला अध्यादेश आघाडी सरकारच्या वेळकाढूपणामुळे रद्द झाला. आणि आता हे मोदींच्या नावाने शंख करीत आहेत. उद्या यांच्या बायकांनी यांना मारले तरी हे मोदींना जबाबदार धरतील असा टोलाही फडणवीसांनी हाणला. आमच्या सरकारच्या काळात तयार झालेले ओबीसी कल्याण मंत्रालयाचे मंत्री म्हणून वडेट्टीवार मिरवत आहेत. ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ. नाही दिले तर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

युवक काँग्रेसच्या बॅनरने खळबळ

व्हेरायटी चौकात आंदोलन सुरू असताना काही काळ युवक काँग्रेसने भाजपाच्या बॅनरवर लावलेल्या बॅनरने काही काळ खळबळ उडाली. अक्षय अरूण हेटे या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्याने हे बॅनर लावले होते. “जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी’ “जय ओबीसी’ असे लिहिलेल्या बॅनरवर पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे विनोद तावडे यांची छायाचित्रे लावली होती. व्यासपीठावरून हे बॅनर काढून टाकण्याचे आवाहन केल्या नंतर एका कार्यकर्त्याने उड्डाणपुलावर जाऊन आक्षेपार्ह बॅनर हटवले.

COMMENTS