छत्रपती संभाजीनगर : आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेवरून वातावरण तापले असून, या प्रकरणात कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दि
छत्रपती संभाजीनगर : आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेवरून वातावरण तापले असून, या प्रकरणात कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांचा हिंसाचाराशी संबंध नसून, दगडफेक सत्ताधारी पक्षाशी संबंधित गुंडांनी केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
दिल्लीत आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या पोलिस व सुरक्षा दलातील कर्मचार्यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. त्यावेळी एका जखमी पोलिस कर्मचार्याच्या मुलीने सांगितले की, आंदोलनादरम्यान तिच्या वडिलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या डोक्यावर टाके घालावे लागले आणि त्यांचा गणवेश रक्ताने माखलेला होता. मात्र, सामाजिक माध्यमांवर त्यांनाच दोषी ठरविण्यात आल्याची खंत तिने व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून शांततापूर्ण आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांनी कोणताही हिंसाचार केलेला नाही. दगडफेक व मारामारी करणारे वेगळे लोक होते. पोलिसांवर झालेली दगडफेकही निषेधार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, घटनास्थळी दगड कसे पोहोचले, दगडांनी भरलेले वाहन कोणी आणले आणि त्यामागे कोण होते, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. दिपके यांनी पुढे म्हटले की, हिंसाचार करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी, याबाबत कोणतेही दुमत नाही. मात्र, कोणताही संबंध नसलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर कारवाई करणे अन्यायकारक आहे. निष्पाप विद्यार्थ्यांना त्रास देण्याऐवजी प्रत्यक्ष हिंसाचार करणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.
पोलिसांच्या तत्परतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित
पुढे बोलताना दिपके यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी दावा केला की, काही दिवसांपूर्वी एका तरुणीच्या वडिलांवर कथित हल्ला झाला होता. त्या घटनेबाबत तक्रार करूनही संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात आली नाही. उलट, धमकीचे चित्रफीत स्वरूपातील संदेश सार्वजनिक झाल्यानंतरही पोलिसांनी तत्परता दाखवली नसल्याचा आरोप त्यांनी केला. घटनांमध्ये वेगवेगळ्या निकषांनुसार कारवाई होत असल्याचा आरोप करत, पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली न राहता निष्पक्ष आणि समान न्यायाच्या तत्त्वानुसार काम करावे, अशी मागणी दिपके यांनी केली.

COMMENTS