Homeताज्या बातम्या

चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर; राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची तुकाराम मुंढेंकडे धाव

मुंबई: राज्यभरातील चित्रपट, मालिका यांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत वाढत्

गौतम खंडागळे ‘अष्टपैलू समाजभूषण’ तर एम.एम.शेख ‘कला-साहित्य व समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित; सा. युवा लोकमित्र सोहळ्यात अभिनंदनाचा वर्षाव
प्रकाशकांनी ३० जून पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावेत; विवरणपत्र दाखल न केल्यास दहा हजारांचा दंड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूरमध्ये रक्तदान शिबीर उत्साहात पारदर्शक
तुकाराम मुंढेंची आता बॉलिवूडच्या शूटिंग स्थळांवर नजर; राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या निवेदनात काय?

मुंबई: राज्यभरातील चित्रपट, मालिका यांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.

चित्रीकरणाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ, पौष्टिक आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे, त्यांच्या आरोग्याचे संरक्षण व्हावे तसेच अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख उद्देशाने ही भेट घेण्यात आली. बैठकीदरम्यान राज्यातील विविध चित्रीकरण स्थळांवर पुरविण्यात येणाऱ्या भोजनाच्या दर्जाबाबत सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. अन्न तयार करण्यापासून ते साठवणूक, वाहतूक आणि वितरणापर्यंतच्या प्रक्रियेत स्वच्छतेचे पालन, शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, अन्नसुरक्षा नियमांचे पालन तसेच उत्पादन संस्था आणि केटरिंग सेवा पुरवठादारांच्या जबाबदाऱ्यांवर सखोल चर्चा झाली.

शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. यामध्ये राज्यातील चित्रीकरण स्थळांवर विशेष तपासणी मोहीम राबविणे, अन्नाच्या गुणवत्तेची नियमित प्रयोगशाळीय तपासणी करणे, निकृष्ट किंवा अस्वच्छ अन्न पुरविणाऱ्या संबंधित संस्था व केटरर्सवर कठोर कारवाई करणे, चित्रीकरण स्थळांसाठी स्वतंत्र अन्नसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे आणि कलाकार व तंत्रज्ञांच्या आरोग्य सुरक्षेसाठी नियमित निरीक्षण यंत्रणा कार्यान्वित करणे, या मागण्यांचा समावेश होता.

अपर मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांनी शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेतली. या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन पुढील आठवड्यात आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि अन्नसुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा निर्माते नितीन धावणे, प्रदेश सरचिटणीस तथा अभिनेत्री अपेक्षा चव्हाण, अभिनेते मिलिंद दास्ताने, अभिनेते सुनील पगार, दिग्दर्शक शिरीष राणे, निर्माते चंद्रकांत विसपुते आणि मराठी चित्रपट वितरक अजय फुटाणे यांचा समावेश होता.

COMMENTS