नांदेड: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या तसेच सध्या पर्यायी व्यवस्थेत सुरू असलेल्या १
नांदेड: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत नांदेड जिल्ह्यात विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या तसेच सध्या पर्यायी व्यवस्थेत सुरू असलेल्या १२२ रास्तभाव दुकानांच्या नवीन परवान्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच या अर्जांबाबत आक्षेप व हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
शासनाच्या ६ जुलै २०१७ व २ फेब्रुवारी २०२२ च्या निर्णयानुसार परवाना रद्द होणे, राजीनामा, मृत्यू, वैद्यकीय कारणे आदींमुळे रिक्त झालेल्या रास्तभाव दुकानांसाठी नवीन परवाने मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता राखण्यासाठी आणि सर्व पात्र संस्थांना अर्ज करण्याची समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, संबंधित जाहिरातीवर प्राप्त झालेल्या अर्जांबाबत आक्षेप किंवा हरकती नोंदविण्यासाठी ३१ जुलै २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली असून त्यानंतर प्राप्त होणार्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. ग्रामपंचायत, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, महिला बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था तसेच इतर पात्र स्थानिक संस्थांनी संबंधित तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून विहित मुदतीत अर्ज किंवा आक्षेप सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड यांनी केले आहे. मुदत संपल्यानंतर प्राप्त होणारे अर्ज किंवा हरकती ग्राह्य धरल्या जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS