अयोध्या: भारत हा एक धार्मिक देश असून कोट्यवधी जनता देवावर विश्वास ठेवून मनोभावे दान करत असते. मात्र, याच कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे, त्यागाच

अयोध्या: भारत हा एक धार्मिक देश असून कोट्यवधी जनता देवावर विश्वास ठेवून मनोभावे दान करत असते. मात्र, याच कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे, त्यागाचे आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राममंदिराच्या दानपेटीवर दरोडा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवित्र मंदिराच्या देणगी चोरीच्या या आरोपामध्ये मंदिर व्यवस्थापनाशी जवळीक असलेल्या व्यक्तींची नावे समोर आल्याने ही केवळ कायदेशीर बाब न राहता राष्ट्रीय वेदनेची घटना बनली आहे.
राममंदिराच्या देणगी पेटीत हात घालणारे हात कोणाचे होते, हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे, तितकाच हा गैरव्यवहार एवढ्या काळापासून कसा सुरू होता आणि व्यवस्थापनाला याचा सुगावा का लागला नाही, असा संतप्त सवाल भाविकांमधून उपस्थित होत आहे. या प्रकरणात विशेष तपास पथकाचा (SIT) अहवाल, संशयितांच्या घरावर पडलेले छापे, हस्तगत केलेली रोकड, दागिने आणि कागदपत्रे हे सर्व काही साधे प्रकरण नसल्याचे संकेत देतात. तक्रार नोंदवल्यानंतर काही तासांतच आरोपींना अटक झाली असली, तरी मोठ्या पदाधिकाऱ्यांची नावे प्रकरणातून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप होत आहे. तसेच, दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. जर त्यांची जबाबदारी नव्हती तर राजीनामा का दिला? आणि जर नैतिक जबाबदारी स्वीकारली, तर त्यांना चौकशीच्या कक्षेबाहेर राहण्याचा अधिकार कोणी दिला? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
या गंभीर प्रकरणामुळे देशातील धार्मिक संस्थांमधील आर्थिक पारदर्शकता, स्वतंत्र लेखापरीक्षण (Auditing) आणि देणगी व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. राममंदिराच्या संदर्भात कोणालाही विशेष राजकीय कवच किंवा संस्थात्मक अभय मिळू नये, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात आता केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीची मागणीही समोर आली असून, लोकांचा विश्वास पुनर्संच्यापित करण्यासाठी संपूर्ण चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे आहे. रामचंद्रांच्या नावावर गोळा झालेल्या धनाचा हिशेब पूर्णपणे पारदर्शक असावा हीच सामान्य जनतेची अपेक्षा आहे.

COMMENTS