पुणे: पुण्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलंच नाराजीनाट्य रंगल्याचं पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात आज युपीएसस

पुणे: पुण्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलंच नाराजीनाट्य रंगल्याचं पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात आज युपीएससी आणि एमपीएससीतील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला. ‘सारथी’ संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला. या वादानंतर मेधा कुलकर्णी रागातच कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्या. या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देताना आता मेधा कुलकर्णी यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
‘जातीचा विषय कशाला आणला?’ मेधा कुलकर्णींचा सवाल
या घटनेबाबत बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “सर्व प्रथम मी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या त्या मुलांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करते. अतिशय चांगल्या मनस्थितीमध्ये मी त्या कार्यक्रमाला गेले होते. अधिवेशन सुरू असल्यामुळे पहिल्या रांगेमध्ये काही खुर्च्या रिकाम्या होत्या. खासदार म्हणून आणि एका कमिटीचे अध्यक्षपद असल्यामुळे तिथल्या अधिकाऱ्यांनी मला प्रोटोकॉलनुसार पहिल्या रांगेत बसण्यास सांगितलं. मी त्यांना म्हटलं की महामंडळाचे अध्यक्ष असल्याने नरेंद्र पाटील देखील इथे बसू शकतात.”
त्या पुढे म्हणाल्या, “आमदार अभिमन्यू पवार यांना त्या ठिकाणी स्वत:ला बसायचं होतं, म्हणून त्यांची धावपळ सुरू होती. त्यावेळी अभिमन्यू पवार मला म्हणाले की, ‘हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही तिथे बसलात तर वाद होईल.’ कार्यक्रम एवढा चांगला सुरू असताना तिथे जातीचा विषय कशाला? मला तिथे प्रचंड गुदमरल्यासारखं (सफोगेट) झालं आणि मी तिथून निघून आले.”
नरेंद्र पाटलांना मेधा कुलकर्णींचे जाहीर आव्हान
दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना नरेंद्र पाटील यांनी ‘तिथे असं काही घडलंच नाही’ असं म्हटलं होतं. त्यावर मेधा कुलकर्णी यांनी थेट उत्तर दिलं आहे. “नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या अत्यंत प्रिय व्यक्तीला स्मरून सांगावं की अभिमन्यू पवार हे वाक्य बोलले की नाही,” असं जाहीर आव्हानच मेधा कुलकर्णी यांनी दिलं आहे. या संपूर्ण वादामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात आणि भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS