किनवट: घरासमोरील वाहन बाजूला सरकवण्याच्या किरकोळ कारणावरून वाद घालत एका महिला सरपंचाचा विनयभंग केल्याची आणि त्यांना व त्यांच्या वयोवृद्ध सासर्या

किनवट: घरासमोरील वाहन बाजूला सरकवण्याच्या किरकोळ कारणावरून वाद घालत एका महिला सरपंचाचा विनयभंग केल्याची आणि त्यांना व त्यांच्या वयोवृद्ध सासर्यांना बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना अंबाडी (ता. किनवट) येथे घडली आहे. याप्रकरणी अंबाडी गावच्या सरपंच शितल गिरिराज जाधव यांनी किनवट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून, पाच जणांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली आहे.
माहितीनुसार, ही घटना २२ जून २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. सरपंच शितल जाधव यांच्या घरासमोर उभे असलेले चारचाकी वाहन बाजूला घेण्याच्या कारणावरून गावातीलच राजू विठ्ठल शिलमवार, प्रथमेश कैलास शिलमवार, कैलास विठ्ठल शिलमवार, बालाजी विठ्ठल शिलमवार आणि श्रेयश बालाजी शिलमवार यांनी वाद उकरून काढला. घरात कोणीही पुरुष मंडळी नसल्याची संधी साधून आरोपींनी महिला सरपंचाचा हात पकडून अश्लील स्पर्श करत त्यांचा विनयभंग केला.
पीडितेने याला विरोध केला असता, आरोपींनी त्यांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण केली. तसेच “तुम्हाला मारून टाकू”, अशी जीवे मारण्याची धमकीही दिली. यावेळी वाद सोडवण्यासाठी आलेले महिला सरपंचाचे सासरे रामा बाजीराव जाधव यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. रामा जाधव हे २० टक्के अपंग असून उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत, तसेच त्यांच्यावर नुकतेच रुग्णालयात उपचार झाले होते. अशा परिस्थितीतही संशयितांनी त्यांना मारहाण केल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या गंभीर घटनेनंतर सरपंच शितल जाधव यांनी २३ जून रोजी किनवटचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेडचे पोलीस अधीक्षक आणि भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) विनयभंग, लैंगिक छळ, मारहाण, शिवीगाळ आणि गुन्हेगारी धमकीच्या कलमांनुसार आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे अंबाडी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

COMMENTS