बीड: बीड शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर बीड शहर बचाव मंचाने अतिक

बीड: बीड शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर बीड शहर बचाव मंचाने अतिक्रमण हटाव मोहिमेला जाहीर पाठिंबा दिला आहे. या मोहिमेत अडथळा निर्माण करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी मंचाने केली आहे.
पार्किंगचा गैरवापर आणि चुकीच्या अफवांमुळे समस्या गंभीर
शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे तसेच बांधकाम परवानगी घेताना तळमजल्यावर वाहन पार्किंगची सोय दाखवून प्रत्यक्षात तिथे दुकाने थाटणाऱ्या व्यापारी संकुलांमुळे वाहतुकीची समस्या अत्यंत गंभीर बनली असल्याचे मंचाने निवेदनात म्हटले आहे. याचा सर्वाधिक त्रास शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. सध्या बीड नगरपरिषद आणि पोलीस वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने संयुक्त मोहीम सुरू आहे; मात्र काही घटकांकडून या मोहिमेला विरोध केला जात असून, सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या व अफवा पसरवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मंचाने केला आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना निवेदन
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने ही कारवाई सुरू असून सर्वांनी याला सहकार्य करावे, असे आवाहन मंचाने केले आहे. या संदर्भात बीड शहर बचाव मंचाच्या वतीने सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले.
यावेळी बीड शहर बचाव मंचाचे अध्यक्ष नितीन जायभाये, मा. प्रा. डी. जी. तांदळे, मातृभूमी प्रतिष्ठानचे डॉ. संजय तांदळे, ज्येष्ठ समाजसेवक सुधीर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलचे माजी जिल्हाध्यक्ष पाशाभाई शेख, पत्रकार कलीम मोमीन, पत्रकार समाजसेवक शाम मार्कंडे, बाजीराव ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS