मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटावर कठोर शब्दांत टीका केली. खासदारांच्या बंडामागे कोणतेही नियोजनबद्ध राजकीय अभियान नसून पक्ष नेतृत्वाचे अपयश कारणीभूत असून ठाकरे गटाची अवस्था भाजपवर लाईन मारायचे आणि लग्न काँगे्रससोबत लग्न करायची अशी असल्याची शेलक्या शब्दांत टीका त्यांनी केली.
माध्यमांशी संवाद साधताना आंबेडकर म्हणाले की, पक्षातील लोकच सत्ताधारी नेत्यांशी संपर्क साधत असतील, वेगवेगळ्या राजकीय पर्यायांवर चर्चा करत असतील आणि त्याचवेळी कार्यकर्त्यांकडून निष्ठेची अपेक्षा ठेवली जात असेल, तर त्यातून संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे. नेतृत्वाने स्वतःची राजकीय भूमिका स्पष्ट ठेवली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. ठाकरे गटाच्या धोरणावर टीका करताना त्यांनी विरोधाभासी राजकारणाचा आरोप केला. एकीकडे भाजपशी जवळीक साधण्याचे प्रयत्न आणि दुसरीकडे काँग्रेससोबत आघाडी कायम ठेवण्याची भूमिका यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे ते म्हणाले. याच कारणामुळे पक्षातील काही लोकांनी वेगळी वाट निवडली असल्याचेही त्यांनी सूचित केले. कार्यकर्ते राजकीय घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करत असतात, त्यामुळे त्यांच्यापासून वास्तव लपविता येत नाही, असे सांगत आंबेडकर यांनी नेतृत्वाने बदलत्या राजकीय परिस्थितीचे भान ठेवण्याची गरज व्यक्त केली. पक्षाच्या भूमिकेत सातत्य नसल्यास त्याचा परिणाम संघटनात्मक पातळीवर होतो, असेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर पूर्वी करण्यात आलेल्या आरोपांनाही उत्तर दिले. आपल्या पक्षाला अनेक वर्षे विशिष्ट राजकीय पक्षाची साथ देणारा पक्ष म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सध्याच्या घडामोडींमुळे जनतेसमोर वास्तव स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. देशातील राजकीय आणि प्रशासकीय निर्णयांमुळे प्रादेशिक समतोल बिघडण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS