बीड । प्रतिनिधी : शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून येऊन मतदारांशी बेइमानी करणारे खासदार ‘ऑपरेशन लुच्चेगिरी’ला बळी पडल्याची तीव्र टीका शिवसेना (उद

बीड । प्रतिनिधी : शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून येऊन मतदारांशी बेइमानी करणारे खासदार ‘ऑपरेशन लुच्चेगिरी’ला बळी पडल्याची तीव्र टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘मातोश्री’ आणि ‘ठाकरे ब्रँड’चा प्रभाव कमी करण्यासाठी मशाल चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांना फोडण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ब्लॅकमेलिंग, विविध आमिषे आणि दबावाच्या माध्यमातून या खासदारांना ठाकरे पक्षापासून दूर करण्यात आल्याचे मारावार यांनी म्हटले.
यावेळी सत्ताधाऱ्यांकडून चालवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’ या नावावरही त्यांनी कडक शब्दांत भाष्य केले. मारावार म्हणाले की, ज्या नेत्याने हे अभियान राबवले त्यांनी नारायण राणे यांचा आदर्श घ्यायला हवा. नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली होती, तेव्हा त्यांनी आपल्या सोबतच्या आमदारांसह पदांचे राजीनामे दिले होते आणि पुन्हा निवडणूक लढवून ते जिंकले होते. त्याचप्रमाणे मशाल चिन्हावर निवडून आलेल्या या खासदारांनी आधी आपल्या खासदारकीचे राजीनामे द्यावेत आणि जनतेच्या कौलावर पुन्हा निवडून येऊन दाखवावे; तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने ‘ऑपरेशन टायगर’ म्हणता येईल.
इतरांची पोरे कडेवर घेऊन नाचणे म्हणजे ‘ऑपरेशन लुच्चेगिरी’ आहे. केवळ सहा खासदारांचा गट स्थापन करणे म्हणजे काही ऑपरेशन टायगर नव्हे, अशी बोचरी प्रतिक्रिया देत येणारा काळच कोण ‘टायगर’ आणि कोण ‘लुच्चा’ हे ठरवेल, असे मारवार यांनी शेवटी म्हटले आहे.

COMMENTS