मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांना जोडणाऱ्या प्रस्तावित अतिवेगवान रेल्वेमुळे (बुलेट ट्रेन) दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्य
मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांना जोडणाऱ्या प्रस्तावित अतिवेगवान रेल्वेमुळे (बुलेट ट्रेन) दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होण्यास मोठी चालना मिळेल. तसेच राज्यातील बंदरे, औद्योगिक पट्टे आणि मालवाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करून महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे प्रभावी केंद्र बनवण्याचा शासनाचा मानस असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रवेळी केंद्रीय रेल्वेमंत्री तसेच माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार ज्ञानेश्वर कटके, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र देशातील माहिती संचय केंद्रांचा (डेटा सेंटर्स) प्रमुख केंद्रबिंदू बनत आहे. देशातील एकूण माहिती संचय क्षमतेपैकी सुमारे ६० टक्के क्षमता राज्यात विकसित होत आहे. यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, सूक्ष्म चिप निर्मिती (मायक्रोचिप मॅन्युफॅक्चरिंग) आणि संशोधनाधारित उद्योगांचे विस्तृत जाळे महाराष्ट्रात उभे राहणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत राज्याने आघाडी घेतल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या विशेष इलेक्ट्रॉनिक्स उद्योग समूहामुळे (इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर) गुंतवणूक वाढेल आणि रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल.
मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्गिका मुख्यमंत्र्यांनी यावेळी महत्त्वाकांक्षी मालवाहतूक रेल्वे मार्गाचा प्रस्तावही मांडला. जवाहरलाल नेहरू बंदर (JNPT) आणि उभारणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या वाढवण बंदराला समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वेमार्गाने जोडण्याची योजना तयार करण्यात येत आहे. हा मार्ग जालना, वर्धा येथील कोरड्या बंदरापर्यंत (ड्राय पोर्ट) आणि पुढे गडचिरोलीपर्यंत विस्तारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे मालवाहतुकीचा खर्च ७ ते ८ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता असून उद्योग क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढेल. परिणामी, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा म्हणून उदयास येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) महाराष्ट्राचा सुमारे १४ टक्के वाटा असून देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचा वाटा २० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी नमूद केले.
इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची उलाढाल १३ लाख कोटींवर : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे कौतुक करत भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील विश्वासार्ह भागीदार बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्य शासनाच्या वेगवान निर्णयप्रक्रिया आणि उद्योगपूरक धोरणांमुळे गुंतवणुकीला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योगाची उलाढाल १३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून इलेक्ट्रॉनिक्स ही भारताची तिसरी सर्वात मोठी निर्यात श्रेणी बनल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS