परळी वैजनाथ : परळी नगर परिषदेच्या हद्दीतील विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथ

परळी वैजनाथ : परळी नगर परिषदेच्या हद्दीतील विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथराव देशमुख यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पालिकेच्या गाळेधारक व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेली ६० टक्के भाडेवाढ आणि ५० हजार रुपयांचे न परतावा (Non-refundable) डिपॉझिट रद्द करावे, यांसह विविध प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी २९ जून २०२६ रोजी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात दीपक देशमुख यांनी परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना सविस्तर निवेदन दिले असून, २५ जूनपर्यंत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास उपोषणावर ठाम राहण्याचा इशारा दिला आहे. निवेदन देण्यापूर्वी मुख्याधिकार्यांसोबत विविध विषयांवर तब्बल पाच तास सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
देशमुख यांनी निवेदनातून शहरातील व्यापारी, पत्रकार, बौद्ध समाज आणि कंत्राटी कामगारांशी संबंधित सात प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये व्यापाऱ्यांची भाडेवाढ रद्द करणे, पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी मंजूर जागा पत्रकारांनाच हस्तांतरित करणे, मराठा भवनाच्या जागेबाबत स्पष्टता आणणे, भीमनगर येथील प्रलंबित बुद्ध विहाराचे काम तातडीने सुरू करणे, छत्रपती संभाजी चौकाचे सुशोभीकरण करणे, सरस्वती नदीवरील अतिक्रमणे हटवून कामाची चौकशी करणे तसेच स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचार्यांचे वेतन शासन निर्णयानुसार ऑनलाइन पद्धतीने अदा करणे या मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनाच्या प्रती बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, जिल्हाधिकारी बीड आणि पोलीस प्रशासनाला पाठवण्यात आल्या आहेत.

COMMENTS