पुणे : येरवडा परिसरात मध्यरात्री गोंधळ घालणाऱ्या तरुणांच्या टोळक्याला जाब विचारल्याच्या कारणावरून एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्य

पुणे : येरवडा परिसरात मध्यरात्री गोंधळ घालणाऱ्या तरुणांच्या टोळक्याला जाब विचारल्याच्या कारणावरून एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी मुख्य आरोपीला तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ जून रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास येरवड्यातील पंचशील नगर भागात घडली. उमेश मंगलदास गायकवाड (वय ३२) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. उमेश गायकवाड हे आपल्या मित्रांसह परिसरात उभे असताना काही तरुण तेथे मोठ्याने आरडाओरडा करत गोंधळ घालत होते. परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने गायकवाड यांनी संबंधित तरुणांना शांत राहण्यास सांगितले.
मात्र, या गोष्टीचा राग आल्याने टोळक्यातील सदस्यांनी गायकवाड आणि त्यांच्या मित्रांशी वाद घालत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. या वादाचे रूपांतर हिंसक झटापटीत झाले आणि आरोपींपैकी एकाने गायकवाड यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून मुख्य आरोपी शोएब रशीद कुरेशी (वय २६) याला अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेल्या इतर तीन संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

COMMENTS