अहिल्यानगर : महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांमागे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची प्रेर

अहिल्यानगर : महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांमागे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व शहराध्यक्ष अनिल मोहिते उपस्थित होते.
यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की, धर्मरक्षणाबरोबरच जनकल्याण आणि स्त्री सन्मानाला अहिल्यादेवी होळकर यांनी नेहमीच प्राधान्य दिले. त्यांनी महेश्वर येथे हातमाग उद्योगाला चालना देऊन महिलांच्या रोजगार आणि आत्मनिर्भरतेची सुरुवात केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांमागे हाच विचार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात एकल महिलांना आधार देण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येत असून, त्या माध्यमातून महिलांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अशी योजना राबविणारा अहिल्यानगर हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा’ ही धर्म, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ठरली, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS