नवी दिल्ली : इराणमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या दहा भारतीय खलाशांची अखेर सुटका करण्यात आली असून त्यांना लवकरच भारतात परत आणण्यात येणार आहे. भारताच

नवी दिल्ली : इराणमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या दहा भारतीय खलाशांची अखेर सुटका करण्यात आली असून त्यांना लवकरच भारतात परत आणण्यात येणार आहे. भारताच्या नौवहन महासंचालनालयाने (DG Shipping) याबाबत अधिकृत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२५ मध्ये एका तेलवाहू जहाजावरील भारतीय खलाशांना इराणच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. हे जहाज जास्क बंदर परिसरात रोखण्यात आल्यानंतर त्यावरील कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी सातत्याने राजनैतिक (Diplomatic) पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवला होता. नौदल महासंचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की, सर्व खलाशांची सुरक्षित सुटका झाली असून त्यांच्या भारतात परतीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे. संबंधित खलाशांना शक्य तितक्या लवकर मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र विभाग आणि अन्य यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत.
या प्रकरणात खलाशांना नेमक्या कोणत्या कारणामुळे ताब्यात घेण्यात आले होते किंवा संबंधित जहाजाविरोधात कोणती कारवाई सुरू होती, याबाबत अधिकृतरीत्या सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या घटनेविषयी काही प्रमाणात गोपनीयता राखण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताने या प्रकरणात संयमित आणि शांत राजनैतिक धोरण अवलंबले. चर्चेदरम्यान कोणतीही आक्रमक भूमिका न घेता इराणशी संवाद कायम ठेवण्यात आला. सार्वजनिक पातळीवर वाद निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली. भारताचे इराणसोबत ऊर्जा आणि व्यापार क्षेत्रात जुने संबंध आहेत. दुसरीकडे, अमेरिका आणि इस्रायल यांच्यासोबतही भारताचे घनिष्ठ संबंध असल्याने या प्रकरणात संतुलित भूमिका राखणे भारतासाठी महत्त्वाचे मानले जात होते.

COMMENTS