नेकनूर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चाला प्रशासनाने परवानगी देऊ नये तसेच मोर्चाच्या बॅनरवर आक्षेपार्ह चित्रांचा वापर करून समाज

नेकनूर येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चाला प्रशासनाने परवानगी देऊ नये तसेच मोर्चाच्या बॅनरवर आक्षेपार्ह चित्रांचा वापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शांतता प्रिय समाज बांधव, नेकनूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी, बीड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मोर्चाच्या प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर एका मुस्लिम व्यक्तीकडून हिंदू महिलेवर अत्याचार होत असल्याचे आक्षेपार्ह चित्र दाखवण्यात आले आहे. या प्रकारामुळे समाजात द्वेष आणि धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असून काही व्यक्तींनी हे चित्र व मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी नेकनूर येथे घडलेल्या किरकोळ भांडणाच्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आधीच कारवाई केली असतानाही पुन्हा त्याच घटनेचा आधार घेऊन समाजात तणाव निर्माण केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनात काही व्यक्तींची नावे नमूद करून त्यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि प्रतिक्रिया दिल्याचा दावा करण्यात आला असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता(बीएनएस)अंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. परिसरातील शांतता व सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार तसेच नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.

COMMENTS