कल्याण : अहिल्यानगर महामार्गावर आज सकाळच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वैशाखरे वळणावर एसटी बस

कल्याण : अहिल्यानगर महामार्गावर आज सकाळच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वैशाखरे वळणावर एसटी बस आणि स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये ४ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
विठ्ठलवाडी आगारातून सकाळी साडेआठ वाजता निघालेली एसटी बस कल्याणहून अहिल्यानगरच्या दिशेने जात होती. मात्र, वैशाखरे टोकावडे हद्दीत बस आणि स्कॉर्पिओ कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वळणावरून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे समजते. या भीषण अपघातात स्कॉर्पिओमधील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर ४ प्रवासी गंभीर जखमी आहेत, विशेष म्हणजे जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून जखमींवर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
माळशेज घाटातील धोकादायक वळणे आणि ओव्हरटेकिंगचा मोह अनेकदा प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. या अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

COMMENTS