नवी दिल्ली : दहा राज्यांतील 37 जागांसाठी होणार्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सात राज्यांमधील 26 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विवि

नवी दिल्ली : दहा राज्यांतील 37 जागांसाठी होणार्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सात राज्यांमधील 26 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विविध पक्षांतील प्रमुख नेत्यांचा यात समावेश असून अनेक ठिकाणी विरोधी पक्षांनी उमेदवार न उभा केल्याने हे उमेदवार मतदानाशिवायच सभागृहात पोहोचले आहेत. यासोबतच उर्वरित 11 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी यांसारख्या महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. काही राज्यांत सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये समन्वय झाल्यामुळे निवडणूक टळली. तथापि सर्वच जागांवर ही स्थिती नसून बिहार, ओडिशा आणि हरियाणा या राज्यांमधील 11 जागांसाठी मतदान होणार आहे.
11 जागांवर 14 उमेदवारांमध्ये चुरस
नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर बिहारमधील पाच, ओडिशातील चार आणि हरियाणातील दोन जागांसाठी एकूण 14 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांमधून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांच्या राज्यसभेत जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. एकूण 10 राज्यांतील 37 जागांसाठी 40 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 26 जण आधीच बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 11 जागांसाठीची लढत आता तीन राज्यांत रंगणार आहे.


COMMENTS