संभाजी ब्रिगेडचे आ.पाचपुते यांना पत्र श्रीगोंदा : सिद्धटेककडे जाणारा श्रीगोंदा-टाकळी कडेवळीत हा इंधन आणि वेळ वाचवणारा मार्ग असून तो सिद्धटेककडे

संभाजी ब्रिगेडचे आ.पाचपुते यांना पत्र
श्रीगोंदा : सिद्धटेककडे जाणारा श्रीगोंदा-टाकळी कडेवळीत हा इंधन आणि वेळ वाचवणारा मार्ग असून तो सिद्धटेककडे जाणारा अतिशय जवळचा व महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र हा मार्ग अनेक वर्षे बंद होता. सन २०१३ पासून हा रस्ता हळूहळू सुरू झाला. या मार्गावरील तीन नद्यांवरील तसेच घोड कॅनॉल पुलांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आली आहेत. सन २०१८ मध्ये माजी आमदार बबन पाचपुते यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत या रस्त्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र त्यानंतर अनेक वर्षे उलटूनही रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने आ.पाचपुते यांना केली आहे.
श्रीगोंदा–सिद्धटेक हा मार्ग अत्यंत जवळचा असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच हा रस्ता कर्जत तालुक्याच्या दक्षिण भागाकडे, राशीन व भिगवन शहराकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे. परिणामी, या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. रस्ता अरुंद असल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
हा रस्ता किमान सात मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे. या मागणीसाठी भिंगान येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने व उपोषणे केली आहेत. सामाजिक कार्यकर्ते नाना शिंदे यांनीही या मागणीसाठी वारंवार उपोषण केले आहे.
सध्या रस्त्यावरील सर्व पुलांची कामे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे आता नवीन रस्ता होणे अत्यंत आवश्यक बनले आहे. नवीन आमदार निश्चितच या रस्त्याचे काम मार्गी लावतील, अशी आशा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS