हिंदू धर्म हा आमचा जगण्याचा संस्कार आहे. याशिवाय आम्ही श्वास घेऊ शकत नाही; कारण, आमच्या साधू-संतांनी आम्हाला मानवतेचा आणि निसर्ग रक्षणाचा संदेश

हिंदू धर्म हा आमचा जगण्याचा संस्कार आहे. याशिवाय आम्ही श्वास घेऊ शकत नाही; कारण, आमच्या साधू-संतांनी आम्हाला मानवतेचा आणि निसर्ग रक्षणाचा संदेश दिला आहे. संत तुकाराम महाराजांनी तर आपल्या अभंगांमध्येच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ असा थेट अभंग गाऊनच आपले निसर्गावरचं प्रेम व्यक्त केलं. अर्थात, संत पदाला पोहोचलेले हे महामानव आपल्या जगण्याला जसं जाणत होते; तसे, विश्वाला ही जाणत होते. त्यामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ज्या संतांनी म्हटलेलं आहे, त्या संतांनी केवळ माणूस किंवा त्या देशातील दगड धोंड्यांच्या विषयी असं म्हटलेलं नाही; तर, संपूर्ण सृष्टीच्या संरक्षणार्थ ही दया-करुणा व्यक्त केली आहे. माणसाचा श्वास हा निसर्गात असलेल्या झाडाझुडपांच्या ऑक्सिजनवर अवलंबून आहे; किंवा त्यांच्या प्राणवायूवर अवलंबून आहे! ही गोष्ट जगाच्या तीव्रपणे लक्षात आली, ती म्हणजे संपूर्ण जगात महामारीचा विषय ठरलेल्या कोरोना काळामध्ये. ऑक्सिजनचा एक सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांना जंग-जंग पछाडावे लागत होते. तरीही, रुग्णांची संख्या अधिक आणि ऑक्सिजन सिलेंडरची संख्या कमी, असं व्यस्त प्रमाण झाल्यामुळे अनेक रुग्णांना किंवा व्यक्तींना ऑक्सिजन शिवाय किंवा प्राणवायू शिवाय जीव गमवावा लागला. या महामारीच्या घटनेला अजून पाच वर्षे ही उलटली नाही; तेव्हा, झाडांचं खरं महत्व जगाच्या लक्षात आहे! मात्र, याच काळात चीन सारख्या देशांनी ऑक्सिजन विक्री मधून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला. माणूस जीव वाचवण्यासाठी किती खर्च करू शकतो, याचं प्रमाण उदाहरण कोरोना काळामध्ये वैद्यकीय सेवा मिळवणाऱ्या रुग्णांना, ज्या पद्धतीने लुटल गेलं; त्यातून आपल्याला निश्चितपणे दिसतं. या सगळ्या गोष्टींना जर लक्षात घेतलं तर, निश्चितपणे जगामध्ये किंवा विश्वामध्ये प्राणवायूचा निर्माता असणारी झाडं ही जगणं आणि जगवणं अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे, महाराष्ट्राच्या भूमीवर नाशिक येथे होत असलेला कुंभमेळा हा मोकळ्या जागेत साधू ग्राम करून घेण्यात यावा; अशी आमची ही भूमिका आहे. कारण, जी झाडं त्या ठिकाणी आहेत, ती प्राणवायूचा स्रोत आहेत. आधीच भारत पर्यावरणाच्या दृष्टीने जगाच्या यादीमध्ये अत्यंत प्रदूषित देशांमध्ये समाविष्ट होत आहे. आपली अनेक शहरं प्रदूषित शहरं म्हणून गणली जात आहेत. प्रदूषित असणाऱ्या या शहरांमध्ये, महानगरांमध्ये अनेक रोगांनी आपला जम बसवला आहे. मुंबईसारख्या महानगरामध्ये तर, आटोक्यात येऊन पूर्णपणे दुरुस्त होतो; अशा रोगांचे रुग्ण देखील उपचाराला, औषधाला दात देत नाही, अशी स्थिती आहे. दम्याचे रुग्ण देखील महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. या सगळ्या रुग्णांनाच वाचवण्यासाठी ऑक्सिजन गरजेचा आहे, असं नव्हे! तर, संपूर्ण सजीव सृष्टी ज्यामध्ये माणूस प्रधान आहे, त्याचं जीवन जगणं आणि जगवणं आणि ते समृद्ध करण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्राणवायू निर्माण करणारी वृक्ष ही अतिशय महत्त्वाची आहेत. राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा हा प्राणवायू तोडणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. साधू ग्राम वृक्षांच्या सानिध्यात अधिक चांगल्या प्रकारे उभारला जाऊ शकतो. खऱ्या अर्थाने अध्यात्माला साध्य करणारे असतील तर, त्यांनी निश्चितपणे संत ज्ञानेश्वर यांची भूमिका लक्षात घ्यावी की, जो खरा साधू आहे अध्यात्मवादी आहे, तो गवतावर देखील पाय ठेवत नाही! कारण, ते गवत हे सजीव आहे आणि जेव्हा काही वर्षांची वृक्ष तोडण्याची भूमिका साधू ग्राम साठी घेतली जाते, तेव्हा, एकही साधू त्या विरोधात बोलत नाही, ही बाबत साधूंच्या अध्यात्मा विषयी शंका निर्माण करणाऱ्या ठरतात. आम्ही हिंदू धर्माचे निस्सीम पाईक आहोत. हिंदू धर्माची संस्कृती जगतो आणि तिचे वाहक ही आहोत! परंतु, कधीही आम्ही वृक्षाला, पर्यावरणाला नुकसान पोहोचवत नाही. पोहोचवलं नाही! कारण, हे पर्यावरणच मानवी जीवनाचा आणि संपूर्ण सजीव सृष्टीचा आणि जीवनसृष्टीचा जगण्याचा मूलभूत आधार आहे! ही बाब सबंध समाजाने तर लक्षात घ्यावीच, परंतु, या विरोधात साधुसंतांनीच आवाज उठवावा. त्यांच्या भौतिक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी जर लोकांना ऑक्सिजन पुरवणारा प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची कत्तल होत असेल तर, वृक्षतोड रोखण्यासाठी साधू आणि त्यांचे आखाडे पुढे येतील, अशी आम्ही अपेक्षा करतो. कारण, मानवी जीवन हे ज्या तत्त्वावर आणि मूल्यांवर आधारित आहे, ही तत्त्व-मूल्य ही साधू ग्रामच्या निर्मितीसाठी वृक्षांची कत्तल करू नये, ही भूमिका थेट साधूंनी घ्यावी. कुंभमेळ्याल जे अध्यात्मिक तंत्राला गालबोट लागू नये, याची जबाबदारी निश्चितपणे साधूंची आहे. त्यामुळे साधू आणि त्यांच्या आखाड्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. हजारो वृक्षांची कत्तल करणे म्हणजे एकाच वेळी या जीवसृष्टी मधील लाखो जीवन नष्ट करण्याचा प्रयत्न करणे होय. अशा प्रकारे हिंसावादी भूमिका साधू समाजाने आणि शासनाने ही घेऊ नये. जनता आणि जनतेचा प्राण आणि यासृष्टीचं संतुलन हे सर्व परी आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं.

COMMENTS