रुग्णालयांसमोरील गर्दी आता पोलिसांचे टार्गेट ; विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले उपाययोजनांचे आदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुग्णालयांसमोरील गर्दी आता पोलिसांचे टार्गेट ; विशेष पोलिस महानिरीक्षकांनी दिले उपाययोजनांचे आदेश

जिल्ह्यामध्ये व नगर शहरामध्ये असणार्‍या खासगी व शासकीय रुग्णालयांच्या ठिकाणी व परिसरात रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर येत असतात.

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास सर्वोच्च प्राधान्य: जिल्हाधिकारी डॉ. भोसले
रोहमारे महाविद्यालयातील विद्यार्थीनीस पारितोषिक प्रदान
तालुक्यातील घुमटवाडी येथे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि स्पर्धाचे आयोजन

अहमदनगर/प्रतिनिधी- जिल्ह्यामध्ये व नगर शहरामध्ये असणार्‍या खासगी व शासकीय रुग्णालयांच्या ठिकाणी व परिसरात रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर येत असतात. तेथे आल्यानंतर जेवणासाठी सुद्धा त्यांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांमध्ये रुग्णालयांबाहेरची गर्दी कमी करता येईल का, यादृष्टीने विशेष उपाययोजना कराव्यात, असे आदेश नाशिक विभागाच्या विशेष  पोलिस  महानिरीक्षक अवस्थी दोरजे यांनी सोमवारी येथे दिले. 

    दोरजे यांनी नगर जिल्ह्यातील पोलिस विभागाचा आढावा येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके आदींसह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात असून, त्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. ज्या पोलिसांचे लसीकरण झाले नाही, तेसुद्धा तात्काळ पूर्ण करावे. स्थानिक पातळीवर जी काही मदत आपल्याला करता येईल ती करा. पोलिस दलामधील ज्यांचे लसीकरण पूर्णत्वाला गेले आहे, त्याची खात्री करा. ज्यांना लस दिलेली नाही, त्यांचे तात्काळ लसीकरण कसे होईल हे त्वरित पाहावे. तसेच जे पोलिस कर्मचारी कोरोनातून बरे झालेले आहेत व आता घरी उपचार घेत आहे, अशांच्या संदर्भामध्ये विशेष काळजी घ्यावी. त्यांच्या उपचार पद्धतीची माहिती सातत्याने घ्यावी, अशा सूचनाही दोरजे यांनी दिल्या असल्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे व जे आरोपी फरार आरोपी आहेत, त्यांना शोधून अटक करावी, तसेच जिल्ह्यामध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांचा तपास तात्काळ करावा, असे आदेशही त्यांनी दिल्याचे सांगून पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा आढावा त्यांनी घेतला. लॉकडाऊन काळात ज्या केसेस केलेल्या आहेत, त्यामध्ये अजून काही सुधारणा करता येईल का हे पाहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सध्या कोरोनाचा विषय सुरू आहे. त्यामुळे उपाययोजनांबरोबरच खबरदारीही सर्वांनीच घेतली पाहिजे. म्हणून आता नव्याने बीट मार्शल प्रत्येक ठिकाणी कार्यान्वित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या असल्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

रस्ते बंद होऊ देऊ नका

पावसाळा सुरू होत असल्याने काय उपाययोजना तात्काळ करता येतील, याचा विचार करून त्याची अंमलबजावणी केली जावी. पावसाळ्यामध्ये जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्ते अथवा गावातील रस्ते बंद होणार नाहीत, याची सुद्धा खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

COMMENTS