मनपा निवडणुकीची काँग्रेसने सुरू केली आतापासून तयारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपा निवडणुकीची काँग्रेसने सुरू केली आतापासून तयारी

प्रदेशाध्यक्ष आ.पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेचे स्वागतअहमदनगर/प्रतिनिधी- नगर महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक अजून अडीच वर्षांनी म्हणजे डिसेंबर 202

विखे-जगतापांना फाईट देणार आता लंके – काळे; एकमेकांना ताकद दिली जाणार, नगर दक्षिणेच्या राजकारणात येणार रंगत
आमदारांमुळे शहराची दुरवस्था; काळे यांचा आरोप; आसूड मोर्चाचा दणदणाट
काँग्रेसच्या पुढाकाराने बारामतीत ओबीसींचा एल्गार

प्रदेशाध्यक्ष आ.पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेचे स्वागत
अहमदनगर/प्रतिनिधी- नगर महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक अजून अडीच वर्षांनी म्हणजे डिसेंबर 2023मध्ये असली तरी ती स्वबळावर लढवण्याची तयारी शहर जिल्हा काँग्रेसने आतापासून सुरू केली आहे. आतापर्यंत नगर मनपाच्या निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र लढवल्या आहेत. मात्र, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्याने तिचे शहर जिल्हा काँग्रेसने स्वागत केले आहे व आगामी मनपा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल, असेही शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले आहे. अर्थात यासंदर्भातील अंतिम निर्णय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा असेल, असेही आवर्जून स्पष्ट केले आहे.
दिल्लीत काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढेल, अशी घोषणा दिल्लीतूनच केली आहे. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची उपस्थिती होती. त्यामुळे आ. पटोले यांनी केलेल्या घोषणेला पक्षश्रेष्ठींची संमती असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर आ.पटोले यांच्या या घोषणेचे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने स्वागत करीत असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काळे यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात बोलताना काळे यांनी सांगितले की, याआधीच्या मनपा निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राहिलेली आहे. ज्या प्रभागांमध्ये काँग्रेसचा मतदार आहे, त्याच प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचा देखील मतदार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा राष्ट्रवादीला कायमच फायदा झाला आहे. मात्र, यातून काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. दर वेळच्या जागा वाटपामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी म्हणून निवडून येऊ शकणार्‍या जवळपास सर्वच जागा या राष्ट्रवादी आपल्या पदरात पाडून घेते आणि इतर पक्षांचे प्राबल्य असणार्‍या प्रभागांमध्ये काँग्रेससाठी जागा सोडल्या जातात, असा दावा करून ते म्हणाले, यामुळे काँग्रेसच्या ताकदीचा उपयोग राष्ट्रवादीला झाला. मात्र, राष्ट्रवादीचा काँग्रेसला कोणताही फायदा झाला नाही. उलटपक्षी काँग्रेसचे खच्चीकरण झाले असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळेच काँग्रेस नगरसेवकांची मनपातील संख्याही कमी राहिली, असा दावा काळे यांनी केला.

मनपात विरोधातच राहणार
सध्याची शहरातील राजकीय परिस्थिती पाहता सर्वच पक्ष एकत्र आल्याचे चित्र जनतेला पाहायला मिळत आहे. मात्र, काँग्रेस या सर्वपक्षीय सहमती एक्सप्रेसचा अजिबात भाग नसून नगर शहरातील जनसामान्यांच्या प्रश्‍नांवर आवाज उठवत खर्‍या विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेसच वठवत आहे तसेच आगामी अडीच वर्षांमध्ये नगरकरांच्या हिताच्यादृष्टीने काँग्रेस अधिक आक्रमकपणाने विरोधी बाकावरून काम करणार असल्याचा पुनरुच्चार करून काळे म्हणाले, आगामी मनपा स्वबळावर लढवणार असल्याने आत्तापासूनच संभाव्य उमेदवारांना त्या-त्या प्रभागात ताकद देण्याचे काम काँग्रेसच्यावतीने केले जाईल. काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असून अजून अनेक चांगले आणि वजनदार चेहरे पक्षात येण्याच्या वाटेवर आहेत. महसूल मंत्री थोरात यांच्याशी चर्चा करून योग्य वेळी त्यांनाही प्रवेश दिले जातील, असे त्यांनी सांगितले. मनपा निवडणुका जरी अजून लांब असल्या तरी देखील ही सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच संघटनात्मक बांधणीसाठी आत्तापासूनच कंबर कसून कामाला लागलो आहोत, असे सांगून काळे म्हणाले, शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची स्वबळाची भावना ही मंत्री थोरात यांच्यासमोर मांडली जाईल. त्यावर अंतिम निर्णय त्यांचाच असेल, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

विरोधाला येणार धार
सरकार आणि संघटना या दोन स्वतंत्र गोष्टी असून पक्ष वाढीसाठी काम करायचे स्वातंत्र्य प्रत्येक पक्षाला असल्याचे आ. पटोले यांनी म्हटले आहे तसेच नगर मनपामध्ये काँग्रेस सत्तेत आहे की विरोधात, या प्रश्‍नावर महसूल मंत्री थोरात यांनी माहिती घेऊन सांगतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याने स्थानिक पातळीवर मनपातील सत्ताधार्‍यांच्या विरोधात शहर जिल्हा काँग्रेसद्वारे घेतल्या जात असलेल्या भूमिकेला नेतृत्वाची मूक संमती असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरी प्रश्‍नांवरून शहरात मनपा सत्ताधारी विरुद्ध शहर जिल्हा काँग्रेस असे चित्र अधिक धारदार होण्याची चिन्हे आहेत. तशात काँग्रेसने शहरातील खड्ड्यांच्या प्रश्‍नावरून काढलेल्या आसूड मोर्चानंतरच मनपा प्रशासनाकडून डागडुजी सुरू झाल्याने तसेच ज्वलंत प्रश्‍नांना आक्रमकपणे वाचा फोडण्याचे काम काँग्रेस करेल, असे काळेंनी जाहीर केल्याने मनपातील संघर्ष गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनपा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवण्याची तयारी एकीकडे सुरू झाल्याने शहर राष्ट्रवादीची यावरची भूमिका उत्सुकतेची झाली आहे.

COMMENTS